कोल्हापूर -कोल्हापुरातील सिद्धगिरी कणेरी मठात कर्नाटक भवनाची पायाभरणी करण्यात आली आहे. या कर्नाटक भवनाला तीव्र विरोध दर्शविण्यात येत आहे. तसेच सीमाभागात मराठी भाषिकांची गळचेपी होत असल्याचा आरोपही करण्यात येत आले. या स्थितीत कोल्हापूरात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी कणेरी मठातील कर्नाटक भवनला कडाडून विरोध केला आहे. वर्षानुवर्ष कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी करत असताना महाराष्ट्रात कर्नाटक’ हे नाव कशासाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात कर्नाटक भवन हे राज्य सरकारचे अपयश असून कोणत्याही परिस्थितीत हा प्रयत्न हाणून पाडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
रविकिरण इंगवले म्हणाले, धार्मिक कार्यक्रमाच्या आडून कोणी राजकीय पक्षांचे काम करणार असेल, तर त्याला थारा दिला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. शिवसेनेकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यावरून कर्नाटक भवनमुळे वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कोल्हापुरातील सिद्धगिरी कणेरी मठात कर्नाटक भवन उभारणीसाठी पायाभरणी केली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल. संतोष, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, शशिकला जोल्ले आणि बोम्मई मंत्रिमंडळातील दहा मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.