Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरची डेडलाइन दिली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला कडक शब्दात इशारा दिला आहे. मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या, उगाच गाजर दाखवू नका, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
“मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून कुणबी नोंदी शोधण्याच्या कामाला गती द्यावी अशी विनंती आहे. उपोषण सोडताना जे ठरले होते त्याबाबत अजून सरकारने Time Bond दिला नाही, तो तातडीने द्यावा. मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या, उगाच गाजर दाखवू नका. ओबीसीमध्ये आमचे आरक्षण आहे ते आम्हाला मिळावे. त्यामुळे ते आम्हाला कमी मिळेल असे वाटत नाही. ठरल्याप्रमाणे Time Bond तातडीने द्यावा. मनुष्यबळ वाढवा 24 डिसेंबरच्या आत अहवाल देऊन आरक्षण द्या, नाहीतर जड जाईल, “असा इशारचा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
“ओबीसी नेत्यांचे लाड करू नये”
पुढे ते म्हणाले, “ज्यांच्या नोंदी कुणबी असेल त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. सरकारने नोंदी शोधण्यात निधी कमी पडू देऊ नये. तातडीने वर्ग करावे, नसता आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल, खोटी फसवणूक मराठा समाज सहन करणार नाही. सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, उगाच काही ओबीसी नेत्यांचे लाड करू नये असेही जरांगे पाटील म्हणाले.
EWS मध्ये मराठा समाजाला 8.30 टक्के आरक्षण मिळू शकते. तेच OBC मध्ये फक्त 3.50 टक्के आरक्षण मिळेल. म्हणजे ओबीसीमध्ये आरक्षणाचा लाभ कमी होईल, याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले. याबाबत प्रश्न विचारला असता जरांगे पाटील म्हणाले, ओबीसीत लाभ कमी होणार असे नाही. आमचे पूर्वीपासून गिळलेले आहे, ते बाहेर काढायचे आहे. मराठा समाज ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या मुलांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. काही कमी होणार नाही. आरक्षण कमी मिळणार नाही. ओबीसीत नोंदी सापडतील, त्याप्रमाणे मराठा समाजाला सरकट आरक्षण द्यावे ही मागणी आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत,” मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.