नवी दिल्ली : काँग्रेसमधील बंडखोर नेते गुलाम नबी आझाद यांनी माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर घणाघाती टीका करत पक्षाला रामराम ठोकला. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आझाद नवा पक्ष स्थापन करणार असल्याचे सांगितले जाते. आझाद यांनी पक्ष सोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जम्मू-काश्मीरचे माजी युवा काँग्रेस अध्यक्ष अमिन भट यांनी, “गुलाम नबी आझाद जम्मू आणि काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री असतील” असे मोठे वक्तव्य केले आहे.
माजी आमदार असलेल्या अमिन यांनी आज सकाळीच आझाद यांची भेट घेतली. या भेटीनंतर अमिन यांनी आझाद यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली. यावेळी अमिन यांनी आझाद आणि त्यांचे समर्थक हे भाजपाची टीम बी नसल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. “आम्ही पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा चर्चा केली. आम्ही भाजपाची बी टीम नाही,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘‘रिमोट कंट्रोल पद्धतीने यूपीए सरकारची विश्वासार्हता संपुष्टात आली होती, आता काँग्रेसमध्येच हा प्रयोग केला जात आहे. सोनिया गांधी या केवळ नामधारी अध्यक्ष असून सर्व निर्णय राहुल गांधी वा त्यांचे सुरक्षारक्षक किंवा खासगी सचिव घेत आहेत,’’ अशी कठोर टीका आझाद यांनी सोनिया गांधींना पाठवलेल्या पाच पानी राजीनामापत्रात केली आहे.