लाहोर : पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. पाकमधील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत या पूरामध्ये ९३७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३४३ लहान मुलांचा समावेश आहे. देशातील ३० लाख लोक बेघर झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानमधील सिंध प्रांतामध्ये ३०६ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. १४ जूनपासून या भागामध्ये अनेकदा जोरदार पाऊस पडला आहे. पाकिस्तानमधील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीने या कालावधीमध्ये मरण पावलेल्याची आकडेवारी जाहीर केली आहे. बलुचिस्तानमध्ये एकूण २३४ जणांचा या पूरामुळे मृत्यू झाला आहे. तर खैबर-पख्तूनख्वामध्ये १८५ आणि पंजाब प्रांतात १६५ जण मृत्यूमुखी पडले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये ३७ जणांचा मृत्यू झाला असून गिल्ट-बालटीस्तानमध्ये एकूण नऊ जण मरण पावले आहेत.
सिंध आणि बलुचिस्तानला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. सिंधमध्ये ७८४ टक्के तर बलुचिस्तानमध्ये ४९६ टक्के अधिक पाऊस पडल्याचं वृत्त डॉन या वृत्तपत्राने दिलं आहे. अचानक मोठ्याप्रमाणात पाऊस पडल्याने पूर आले. खास करुन दक्षिण पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील २३ जिल्ह्यांना नैसर्गिक आपत्तीबाधित म्हणून घोषित करण्यात आले आहे.
वातावरण बदलासंदर्भातील मंत्री शेरी रेहमान यांनी पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये वॉर रुम सुरु करण्यात आल्याचं सांगितलं आहे. देशभरातील पूरग्रस्त भागांमध्ये मदत पोहचवण्याचं काम या माध्यमातून केलं जात आहे. ही पर्जन्यवृष्टी भयानक असून पावसामुळे आम्हाला मदतकार्य पोहचवण्यात खास करुन हेलिकॉप्टरने मदत पोहचवण्यात अडचणी येत असल्याचं रेहमान म्हणाल्या.