नवी दिल्ली: दोन माजी माहिती आयुक्तांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तेलगू कवी पी. वरवरा राव यांच्या सुटकेची मागणी केली आहे. वरवरा राव सध्या भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत.
80 वर्षीय वरवरा राव यांना अलिअडेच प्रकृतीअस्वास्थतेच्या कारणास्तव जे.जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे मानवतावादी भूमिकेतून त्यांची सुटका करण्यात यावी, असे शैलेश गांधी आणि श्रीधर आचार्यलू या दोन माजी माहिती आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. वरवरा राव यांच्याविरोधात पुरावे नसल्याचेही या पत्रात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सिद्ध करण्यासाठी पुणे पोलिस आणि राज्य अन्वेषण पथक पुरावा गोळा करू शकले नाहीत, असे या पत्रात म्हटले आहे.
कार्यकर्ते सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, शोमा सेन, अरुण फेरेरा, व्हर्नन गोन्साल्विस, सुधा भारद्वाज आणि वरवरा राव यांना माओवाद्यांशी असलेल्या कथित संबंधांवरून पुणे पोलिसांनी अटक केली आहे. महाराष्ट्रातील सरकार बदलल्यानंतर भीमा कोरेगाव हिंसाचाराचे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ताब्यात घेतले आहे.