कोपरगाव (प्रतिनिधी) – करोनाच्या वैश्विक संकटात आ. आशुतोष काळे सातत्याने मतदारसंघात फिरत आहे. यामध्ये करोनाच्या उपाय योजना असतील किंवा रखडलेल्या व कासवगतीने सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी असेल. दुसऱ्या लॉकडाऊननंतर जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत त्यांनी कोपरगाव तालुक्यात करोनास प्रतिबंध करत मतदारसंघातील विकासकामांना सुरुवात देखील केली आहे. नुकताच त्यांनी मतदार संघातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. त्यावेळी भविष्यात मतदारसंघ टॅंकर मुक्त करायचा असल्याचे त्यांनी सांगितले.
एकीकडे करोनाच्या धास्तीने सगळ्यांची पाचावर धारण बसली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हात राखून नव्हे, तर अंतर राखून आहे. मात्र आ. काळे यांनी करोनाच्या संकटात देखील विकासकामांकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. तसेच रस्ते, शेती प्रश्नाबरोबरच मतदारसंघातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांकडे आपला मोर्चा वळवून या योजनांच्या कामाला गती दिली आहे. पाणीपुरवठ्याच्या काही जुन्या योजनांना संबंधित विभागाकडून दिला जाणारा निधी थांबविण्यात आला आहे. अशा योजनांसाठी जिल्हा नियोजन समिती व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदींकडून ऊर्जितावस्था देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या योजना अंतिम टप्प्यात आहेत, त्या योजना कायमस्वरूपी कार्यान्वित ठेवण्यासाठी गावठाणसह वाड्या-वस्त्यांवर जास्तीत जास्त नळ जोड देवून नियमित वसुलीच्या माध्यमातून या योजनांचा खर्च भागवावा. तसेच ज्या योजना रखडलेल्या आहेत, त्या योजनांना मूर्त स्वरूप देताना पाण्याच्या स्त्रोत व त्याबरोबरच वितरण व्यवस्थेलाही प्राधान्य द्या, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी उपाध्यक्ष, संचालक, सरपंच, उपसरपंच, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता आहिरे, जिल्हा परिषदेचे यांत्रिकी उपअभियंता बिरासदार सोशल डिस्टन्स पाळून उपस्थित होते.