मुंबई – राज्यात विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची तयारी आहे. यापूर्वी तसे डोसेस देत देशात अग्रक्रम राखण्यात आले आहे. आता याला अधिक गती आणण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे 100 टक्के लसीकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
कोविड लसीकरण आढाव्यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, करोनाची साथ अजून गेलेली नाही, ज्यांनी लस घेतली आहे त्यांना संसर्गाची खूप कमी भीती आहे. अशांच्या जीवाला कमी धोका आहे हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील टाळाटाळ न करता दोन्ही डोसेस घेण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
तसेच आपापल्या जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश देताना मुख्यमंत्र्यांनी समाजातील सर्वस्तरातील व धर्मांतील लोकांना या लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घेण्याच्या सूचनाही केल्या.