शिर्डी, (प्रतिनिधी) – येथील साईसमाधी मंदिरात भाविकांना हार व फुले वाहण्याची परवानगी लवकरच मिळेल, अशी ग्वाही खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील एका कार्यक्रमात दिली. या निर्णयामुळे हातावर गुलाब गुच्छ विक्रेते, हारांची ओवणी करणाऱ्या महिला व फुलांची शेती करणारे शेतकरी या सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण बघावयास मिळत आहे.
खरं तर कोविड काळातील लॉकडाऊनच्या अगोदरपासून समाधी मंदिरात फुले, हार, प्रसाद नेण्यास भाविकांना बंदी होती, त्याचे मुख्य कारण म्हणजे एजंटच्या माध्यमातून भाविकांची लूट, फसवणूक व मारहाण झाल्याच्या घटनेमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे शिर्डीचे नाव बदनाम झाले होते. याच कारणाचा धागा पकडून शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी शिर्डी पोलीस स्टेशन व साई संस्थांनवर मोर्चा काढून बंदीची मागणी केली होती तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला कडक शब्दांत सूचना देत ही बंदी कायम ठेवली होती.
परिणामी अनेक तरुण व महिला यावर उदरनिर्वाह करून आपल्या कुटुंबाची रोजी रोटी मिळवत होते, मात्र ते बेरोजगार झालेच होते परंतु त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. हार, फुले हा श्रध्देचा व धार्मिक अस्मितेचा मुद्दा आहे म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी भाविकांच्या हिंदू धर्मातील रूढी परंपरेचा व श्रध्देचा आधार घेत आंदोलन केले होते होते.
नगरसेवक सुरेश आरने व आरटीआय कार्यकर्ते दिगंबर कोते पाटील यांनी भाविकांना साई मंदिरात हार, प्रसाद व फुले अर्पण करण्यासाठी उपोषण करून आंदोलन केले होते. आता एका ज्येष्ठ वकिलाची नियुक्ती करून हा निर्णय लवकरच मार्गी लागेल ,असे सूतोवाच डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत होत आहे.
शिर्डीतील गोरगरीब जनतेच्या हितासाठी आम्ही अनेक दिवसांपासून या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो, अखेर त्याला यश मिळाले . नीलेश कोते पाटील, मा. उपनगराध्यक्ष शिर्डी.
ही बाबांची पुण्यनगरी आहे. आंतरराष्ट्रीय तीर्थस्थान असल्याने अनेक भाविकांना समाधीवर फुले वाहण्याची इच्छा असूनही बंदीमुळे ते नाराज झाले होते, मात्र आता प्रत्येकाला समाधी मंदिरात हार फुले अर्पण करता येईल, याचा आनंद होत असून माझ्या आंदोलनाला अखेर यश मिळाले. सुरेश आरणे, मा. नगरसेवक, शिर्डी.