टाकळीभान (वार्ताहर) – श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारने गेल्या चार वर्षाच्या तुलनेत संचालक मंडळाने उत्पन्न वाढीसोबतच काटकसरीचा कारभार करून संस्थेला ११ लाखांचा नफा मिळून दिला आहे. विरोधी संचालक विकासकामाला सतत गेले वर्षभर आडकाठी घालत असल्याने मंजूर विकासकामे निधी असूनही रखडल्याचा हल्लाबोल बाजार समितीचे संचालक मयूर पटारे यांनी येथील पत्रकार परिषदेत केला.
पटारे म्हणाले की, माजी आ.भानुदास मुरकुटे व माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या मार्गदर्शानाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुधीर नवले यांच्या नेतृत्वाखाली गेले वर्षभर संस्थेच्या हिताचे व काटकसरीने काम करीत आहे. टाकळीभान उपबाजारला भूतकाळात कधीही झाला नाही एवढा नफा २०२३-२४ या आर्थिक वर्षात झालेला आहे.
यापूर्वी सन २०१९-२० ला उपबाजारला २० लाख ८ हजाराचे उत्पन्न मिळाले होते व १९ लाख १८ हजाराचा खर्च झाल्याने केवळ ९० हजारांचा नफा मिळाला होता. सन २०२०-२१ मध्ये ३० लाख ९९ हजाराचे उत्पन्न मिळाले असले तरी २१ लाख ४३ हजारांचा खर्च झाल्याने केवळ ९ लाख ५६ हजाराचा नफा झाला होता. सन २०२१-२२ मध्ये २६ लाख ३२ हजाराचे उत्पन्न मिळाले होते तर २६ लाख ९ हजाराचा खर्च झाल्याने केवळ २३ हजारांचा नफा झाला होता.
सन २०२२- २३ या प्रशासकाच्या कार्यकाळात २३ लाख ८३ हजारांचे उत्पन्न तर २२ लाख २५ हजारांचा खर्च झाल्याने केवळ १ लाख ५७ हजारांचा नफा मिळाला होता. मात्र, आमच्या सन २०२३-२४ या एका वर्षात २३ लाख ६५ हजारांचे उत्पन्न मिळाले तर केवळ १२ लाख ५७ हजारांचा खर्च झाला.
आतापर्यंतच्या कार्यकाकाळातील सर्वाधिक ११ लाख ७ हजारांचा नफा मिळालेला आहे. कर्मचारी पगार, देखभाल दुरुस्ती, उपबाजार आवारात मुरुम टाकणे, शौचालय बांधकाम व इतर आवश्यक सुविधांसाठीच हा खर्च झालेला आहे. संचालक मंडळाने खर्चात काटकसर व पारदर्शी कामकाज केल्याने संस्थेच्या नफ्यात वाढ झाली आहे.
उपबाजार आवारात सव्वा कोटी खर्चाचे काँक्रेटीकरण, पेट्रोलपंपाला मंजुरी, श्रीरामपूर-नेवासा रोडवर कमान उभारणे, भाजीपाला मार्केट, जनावरांचा बाजार सुरू करणे, उपबाजारासाठी १० एकर जागा उपलब्ध करणे, दुमजली शाॕपिंग सेंटर सुरू करणे आदी विकास कामांसाठी मंजुरी मिळालेली आहे. त्यासाठी खर्च करण्याकरीता निधीही उपलब्ध आहे.
मात्र, विरोधक विकास कामांसाठी गेल्या वर्षभरापासून आडकाठी घालत आहेत. तर सत्तेच्या जोरावर वारंवार चौकशा करीत आहेत. या सर्व प्रकरणात स्थानिक संचालकच तक्रारदार असल्याने उपबाजारसह गावच्या विकासालाही आडकाठी घालत असल्याने बाजार समितीचा व पर्यायाने गावाचाही आर्थिक विकास खुंटल्याची खंतही मयूर पटारे व विलास दाभाडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी संत सावता सोसायटीचे संचालक विलास दाभाडे उपस्थित होते