पुणे, दि. 23 (अंजली खमितकर) – पूर्वी “घ्यायची का भांडीऽऽऽ’ अशी आरोळी ठोकत बोहारणी दारोदार फिरत असे. जुने परंतु बऱ्या स्थितीतील कपडे त्यांना देऊन हवी ती भांडी सर्रास घेतली जात असत. बहुतांश वाडे-वस्त्यांमध्ये ही पद्धत होती, त्यात कमीपणा नव्हता. ती भांडी नवीनच असायची. परंतु, आताच्या “सोकॉल्ड मॉडर्न’ जमान्यात असे काही करण्यात अनेकांना कमीपणा वाटतो आणि नको असलेल्या वस्तू थेट कचऱ्याच्या डब्यात जातात. तेथून त्या थेट कचरा डेपोमधील “लॅंड फिलींग’ला जातात. हेच नेमके टाळून या कचऱ्यात जाणाऱ्या वस्तूंचा पुनर्वापर करण्याचा उपक्रम आता शहरांमध्ये सुरू झाला आहे, त्या गोष्टींचे आपण स्वागत करणे अत्यंत आवश्यक आहे.
लोकसंख्या आणि आर्थिक स्तरातील दरी पाहता हा उपक्रम स्तुत्य आहे. पूर्वी दिवाळी सणालाच कपड्यालत्त्यांची, वस्तूंची खरेदी होत असे. मात्र, आता हे चित्र बदलले आहे. एकाबाजूला उपयोगिता संपली किंवा “आता कंटाळा आला या वस्तूचा’ असे म्हणून वस्तू एखाद्या उपक्रमाच्या माध्यमातून देऊन टाकणे आणि त्याच वस्तू दुरुस्त करून एखाद्या गरजू व्यक्तीने कमी, परवडणाऱ्या किंमतीत विकत घेणे ही बाब होणे अत्यंत आवश्यक बनले आहे. यामुळे विकत घेणाऱ्यालाही मालकीची भावना असली पाहिजे किंवा मिंध्यत्त्वही येता कामा नये.
हाच हेतू ठेवून “वूई-कलेक्ट ऑन व्हिल्स’ असा एक उपक्रम दिवाळीच्या आधी “स्वच्छ’ संस्थेने राबवला. या माध्यमातून केवळ काहीच दिवसांत त्यांनी केवळ एका महिन्यांत 75 टन वस्तू गोळ्या केल्या. ही आदर्श सुरूवात असली तरी याचा गांभीर्याने विचार होणे अत्यंत आवश्यक आहे.
एकाबाजूला बाजारपेठेतून, विंडो शॉपिंगच्या बहाण्याने, ऑनलाइन अशा माध्यमातून भारंभार वस्तू खरेदी करणाऱ्या व्यक्ती आणि दुसरीकडे यातील काहीच न मिळू शकणाऱ्या किंवा घेऊ न शकणाऱ्या व्यक्ती, असा विरोधाभास समाजात मोठ्याप्रमाणात आहे. हा विरोधाभास कमी करण्याच्या दृष्टीने असा उपक्रम स्वागतार्ह आहे. लहानपणी दिवाळीला कपडे घेणे एवढीच चंगळ असायची परंतु आता येता-जाताही आपण कपडे घेतो, ऑनलाइनही खरेदी करतो. नव्या वस्तू येतात पण जुन्याचे काय? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. मग, त्याचा डोंगर निर्माण होतो. ही मनोवृत्ती की विकृती आहे? एका महिन्यात 75 टन चांगल्या अवस्थेतील साहित्य गोळा होते म्हणजे आपण “किती घेतो’, हे यावरून दिसते. हा उपक्रम राबवताना संस्थांनी नोंदवलेल्या निरीक्षणात अनेकदा “टॅग’ न काढलेले कपडेही येतात. यामध्ये शर्ट-पॅंट असतात. याशिवाय अनेक ब्रॅंडेड महागड्या वस्तूही असतात, त्या गरजूंना विकल्यानंतर त्यातून जे पैसे मिळतात ते गरजूंच्या शिक्षणासाठी वापरले जातात. ही चळवळ उभी राहणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
‘युज अँड थ्रो’ घातक संस्कृती…
पाश्चिमात्य देशांमध्ये असे उपक्रम होतात. त्यांच्याकडे पुनर्वापराची संस्कृती पूर्वीपासून आहे, परंतु त्याबरोबरच अत्यंत वाईट असलेली “युज अँड थ्रो’ची संस्कृतीही मोठ्या प्रमाणात आहे. ती त्यांची गरज असली तरी आपण त्याचे अंधानुकरण केले आहे आणि ती संस्कृती अंगीकारली आहे. या “युज अँड थ्रो’ संस्कृतीमुळेच आज कचऱ्याची निर्मिती खूपच वाढली आहे.
‘ऑनलाइन शॉपिंग’ सोयीचे…
करोना प्रादुर्भावाच्या काळात अनेक जण घरूनच काम करत होते, त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा इंटनेटवर जात असे. “वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून काम करणाऱ्या व्यक्ती किंवा एकूणच “ऑनलाइन शॉपिंग’ मोठ्या प्रमाणात सवयीचे झाले. मात्र, त्याबरोबरच टाकून देणेही वाढले. हा पाश्चिमात्य “ट्रेंड’ अर्थव्यवस्थेसाठी चांगला असला तरी सामाजिक स्थितीसाठी तो नाही. त्यामुळे या कचऱ्याच्या पुनर्वापरासाठी जसा स्तुत्य प्रयोग विविध संस्थांच्या माध्यमातून केला जात आहे, तसा “युज अँड थ्रो’ संस्कृतीचा पुनर्विचारही नागरिकांनी करावा हे या निमित्ताने सांगणे आहे.