पुणे, दि. 23 -ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला रविवारी सायंकाळी साडेपाच ते रात्री आठ असे तब्बल अडीच तास तुळशीबाग परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे दुकानदारांसह खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी काहींच्या मोबाईलवर व पाकिटावर डल्ला मारला.
रविवारचा दिवस आणि लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने तुळशीबाग परिसर गर्दीने फुलला होता. त्यामुळे तुळशीबाग परिसरातील सर्व दुकानेही विविध वस्तूंनी भरलेली होती. ऐन सायंकाळी साडेपाच वाजता वीज गेली. त्यामुळे पूर्ण परिसर अंधारात होता. त्यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. एकीकडे पाऊस नव्हता. गर्दीही वाढली होती. आता ग्राहकांकडून खरेदीची वेळ होती. त्याच वेळेस वीज गेल्याने व्यापाऱ्यांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. ऐन खरेदीच्या वेळी अडीच तास वीज गेल्याने व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आणि ग्राहकांना खरेदी न करता माघारी जावे लागले.
तुळशीबाग परिसरातील व्यापारी रवींद्र रणधीर यांनी अडीच तासांपासून वीज नसल्याचे सांगितले. वीज नसल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, ग्राहकांची मोठी गैरसोय झाल्याचे सांगितले. यापूर्वी ऐन दिवाळीत तुळशीबाग परिसरात वीज गेली नव्हती. मात्र सर्व तंत्रज्ञान असतानाही ऐन सणात वीज जाते, यापेक्षा मोठे दुर्दैव काय म्हणावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यासंदर्भात येथील ग्राहकांनी “एमएसईबी’च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संपर्क साधला. मात्र थोड्यात वेळात वीज येईल, असे सांगत होते. मात्र वीज काही वेळेत आली नाही, अशा नाराजी त्यांनी बोलून दाखविली.
वीज गेल्याचा फटका तुळशीबाग परिसरातील व्यापाऱ्यांना बसला. तसाच ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. वीज गेल्याचा फायदा घेत दोन-तीन जणांचे मोबाईल चोरीला गेले. तसेच पाकिटमारीच्या दोन घटना घडल्या. काही ग्राहक रडत बाहेर पडले. ही मनस्पात घडणारी घडना पुण्याच्या दृष्टीने भूषणावह नसल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांतून उमटत होती.
दरम्यान, यासंदर्भात एमएसईबीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधले असता, त्यांनी वीज यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने वीज गेल्याचे सांगितले. अन्य पर्यायी व्यवस्थेतून तुळशीबाग परिसरातील निम्म्या भागात वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.