उत्तम पिंगळे
आठ दिवस स्वर्गाबाहेरच्या महालांमध्ये क्वारंटाइन होऊन नारदमुनी आपल्या आराध्यास भेटावयासाठी आले.
नारदमुनी : नारायण… नारायण… हे केशवा, माझा सादर प्रणाम आपण स्वीकार करावा.
श्रीविष्णू : बोला मुनीवर, कसे आहात आपण? करण बरेच दिवस आपण पृथ्वीतलावर गेला होतात.
नारदमुनी : हे नाथ, आपल्या कृपेमुळे सर्व काही ठीक आहे.
श्रीविष्णू : काय आहे पृथ्वीवरील हालहवाल?
नारदमुनी : आपण तर जाणून आहातच. करोनानामक विषाणूने पृथ्वीतलावर महाभयानक रूप धारण केले आहे. त्यातल्या त्यात जम्बूद्विपामध्ये आता तर कहर झाला आहे. रोज 49 हजारांपेक्षा अधिक रूग्ण वाढत आहेत. आषाढी वारी तर अशीच गेली आणि आता श्रावण हा मुख्य मास आला असून सर्वत्र गोंधळ आहे. कोणते सण साजरे करू नयेत हाच प्रश्न आहे. मी आता कैलासावर जाणार आहे. कारण बालगणेशाचे पृथ्वीतलावर दहा दिवसांकरता आगमन होणार आहे. म्हणून तिथे काय हालचाल आहे, ते पाहून येतो.
श्रीविष्णू : बरोबर आहे मुनीवर, आपण तडक कैलासावर जावे व माता पार्वती व भोलेनाथ यांना पृथ्वीतलावरील अवस्था कथन करावी.
नारदमुनी (नमस्कार करून) नारायण… नारायण.. म्हणून निघतात.
कैलासावर भोलेनाथ व माता पार्वती बसलेले आहेत व श्रीगणेश मुषकाशी खेळत आहेत.
नारदमुनी : नारायण… नारायण… हे भोलेनाथ व माता पार्वती, माझा प्रणाम स्वीकार करावा.
भोलेनाथ : हे नारदा, आम्ही आपलीच वाट पाहत होतो. करण आपण पृथ्वीतलावर गेला होता. काय परिस्थिती आहे?
नारदमुनी : आपल्याला जी पूर्वी सांगितली तीच अजून बिघडत आहे.
पार्वती : हे नाथ, म्हणजे मी जे ऐकले ते खरं आहे. अशा प्रसंगी मीही बाळ गणेशास पृथ्वीतलावर पाठवू शकत नाही. एकूणच तिथे विषाणूने कहर केलेला आहे आणि थोडे थोडके नाही, दहा दिवसांकरता मला बाळ गजाननास पाठवावे लागेल, ते शक्य नाही.
नारदमुनी : पण माते, आपण थोडं माझं ऐकून घेता का?
पार्वती : मुनीवर मला काहीही ऐकायचे नाही. शेवटी मी गणेशाची माता आहे. त्यामुळे मी त्याला पाठवणार नाही म्हणजे नाही. (पलिकडे गजाननाचा चेहरा हिरमुसलेला होतो)
भोलेनाथ : बोला मुनीवर आपल्याला काय म्हणायचे आहे?
नारदमुनी : हे माते, आपण म्हणता ती काळजी अगदी योग्य आहे. पण आता मलाच पाहा, मी पृथ्वीतलावर जवळजवळ तीन पौर्णिमा पाहून आलेलो आहे. आपण गणेशाच्या बाबतीत काळजी करू नये.
पार्वती : पण मनीवर तुमचा एवढा आट्टाहास कशा करता आहे की, गणेशाने पृथ्वीवर जायलाच हवे म्हणून?
नारदमुनी : हे माते, मी सर्व जवळून पाहून आलेलो आहे. अनेक सण उत्सव रद्द झालेले आहेत आणि सर्व लोकांच्या आशा आता फक्त गणेश चतुर्थीवर आहेत. आपापल्यापरीने अगदी घरात घरगुती स्वरूपात जो तो तयारी करत आहे.
(शिवशंकर व पार्वती एकमेकांकडे पाहतात)
पार्वती : हे मुनीवर, आपण म्हणता ते बरोबर आहे. पण मागच्या वेळेसारखी आपण बाळ गजाननाची काळजी घ्यावी.
नारदमुनी : नारायण… नारायण… ते आपण मजकडे सोपवावे. चला येतो आता, असे म्हणून निघू लागतात. (पलिकडे बाळ गणेशाचा चेहरा खुलतो)