नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) आणि भाजपचे खासदार वरूण गांधी (Varun Gandhi) या चुलत बंधूंची मंगळवारी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात (Kedarnath Temple) भेट झाली. ती भेट तशी अल्प काळापुरतीच होती. मात्र, दोन गांधींची (Gandhi brothers) ती दुर्मिळ भेट असल्याने अतिशय लक्षवेधी आणि प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. राहुल आणि वरूण यांच्यात हातमिळवणी होणार का, राजकारणात नवं काही घडणार का यांसारख्या प्रश्नांवरून आता राजकीय तर्क-वितर्कांना उधाण येण्याची शक्यता आहे.
मागील तीन दिवसांपासून राहुल केदारनाथमध्ये आहेत. ते मंदिरात असताना वरूणही तिथे दर्शनासाठी सहकुटूंब दाखल झाले. दोघांची मंदिराबाहेर भेट झाली. त्यांनी एकमेकांशी मनमोकळेपणे गप्पा मारल्या. वरूण यांच्या कन्येची भेट झाल्याने राहुल सुखावले, अशी माहिती सुत्रांनी दिली.
राहुल आणि वरूण यांच्यात कुठली राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्या सुत्रांनी आवर्जून नमूद केले. तसे असले तरी दोन गांधींच्या भेटीचे पडसाद बऱ्याच काळासाठी उमटत राहतील.वरूण आणि त्यांच्या मातोश्री मनेका गांधी प्रदीर्घ काळपासून भाजपमध्ये सक्रिय आहेत. मात्र, मागील काही काळापासून ते त्या पक्षात साइडलाइनला पडल्याचे चित्र आहे.
विविध मुद्द्यांवर वरूण सातत्याने परखड भाष्य करताना दिसतात. त्यांची भूमिका अनेकदा पक्षाच्या धोरणांशी विसंगत स्वरूपाची असते. त्यातून वरूण आणि भाजप पुढील काळातही एकमेकांशी जुळवून घेण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात असते. अशात राहुल आणि वरूण यांची भेट झाली. ती योगायोगाने, अनपेक्षितपणे घडली की पूर्वनियोजित होती याविषयी आता अंदाज बांधले जाऊ लागतील. पण, त्या भेटीने वरूण यांच्या राजकीय भवितव्याचा मुद्दा ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत.