मुंबई – लहान मुलांना संस्कार देण्याचे स्थायी कार्य कुटुंब, समाज व सांस्कृतिक संस्थांकडून होत असते. या संस्कारांच्या माध्यमातून समाज घडतो व समाजाच्या माध्यमातून राष्ट्र निर्माणाचे कार्य होते, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
बालदिनाचे औचित्य साधून बालरंगभूमीसाठी कार्य करणाऱ्या “गंधार’ कला संस्थेतर्फे “गंधार गौरव’ पुरस्कार सोहळ्याचे राजभवन येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल बोलत होते. याप्रसंगी आमदार संजय केळकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की व गंधारचे अध्यक्ष मंदार टिल्लू उपस्थित होते.
भगतसिंह कोश्यारी म्हणाले, संगीत, कला, नाट्य या गोष्टींचा ज्याला गंध नाही अशा व्यक्तीला विना शेपटीचा पशु संबोधले जाते, या अर्थाच्या सुभाषिताचा उल्लेख करून संगीत व नाट्यात दुःख विसरायला लावण्याची ताकत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
बालरंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अभिनेते अतुल परचुरे यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते गंधार गौरव पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आला, तर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना “जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच राज्यपालांच्या हस्ते दिग्दर्शक जयंत पवार, निवेदिका अनुश्री फडणीस, संगीतकार ओंकार घैसास व प्रकाश पारखी यांना गंधार युवा गौरव पुरस्कार देण्यात आले.
“कट्टी बट्टी’ या कार्यक्रमात लहान मुलांनी सादर केलेल्या बालभारती पुस्तकातील बडबडगीतांना राज्यपालांनी कौतुकाची थाप दिली व बालनाट्य चमूला वीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
सत्काराला उत्तर देताना अतुल परचुरे म्हणाले, बालप्रेक्षक हा महत्त्वाचा प्रेक्षक आहे व त्याचे पुढे सादर करणे आव्हानात्मक काम असते. करोनाचे निर्बंध संपल्यावर आपण पुन्हा बालनाट्य घेऊन रसिकांपुढे येऊ, असे त्यांनी सांगितले.