जोहान्सबर्ग – भारताविरुद्ध वॉंडरर्समधील विजय ही दक्षिण आफ्रिका संघासाठी योग्य दिशेने एक वाटचाल आहे. तसे आम्हाला संघात सुधारणा करण्याला वाव असला तरी पुढील सामन्यासाठी गेम प्लॅनमध्ये फारसा बदल होणार नाही, असे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याने सांगितले.
पहिल्या कसोटीत 113 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतावर 7 गडी राखून विजय मिळविला. या विजयासह त्यांनी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.आता या मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना केपटाऊनमध्ये होणार आहे.
डीन एल्गर म्हणाला, आम्ही योग्य दिशेने सकारात्मक पाऊल उचलले आहे. आम्हाला अनेक आव्हानांचा सामना करायचा आहे. त्यामध्ये मंगळवारपासून सुरू होणाऱ्या सामन्याचाही समावेश आहे. या सामन्यात वेगळेच आव्हान असेल. खेळाडू याचा कसा सामना करतात हे महत्त्वाचे आहे. आम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहोत. तसेच दुस-या कसोटीतील विजयामुळे आमच्या अनेक खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे.
आमच्या संघात अनुभवाची कमतरता आहे. सर्व गोष्टी आमच्या बाजूने नसतील याची देखील आम्हाला कल्पना आहे. आम्हाला आमच्या रणनीतीवर काम करावे लागेल. आम्ही आमच्या रणनीतीमध्ये कोणताही बदल करणार नाहीत, असा इशारा एल्गरने भारतीय संघाला दिला आहे.
दरम्यान, जोहान्सबर्गमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने दिलेल्या 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डीन एल्गारने नाबाद 96 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता.