जयंत कुलकर्णी
जिल्ह्याचा दबदबा पुन्हा वाढतोय; तनपुरेंना दिलेल्या संधीचे निकष काय? : जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता
नगर – महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळ विस्तारात नगर जिल्ह्याला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यापाठोपाठ शंकरराव गडाख व प्राजक्त तनपुरे यांच्या माध्यमातून तीन मंत्रिपदे मिळाली आहेत. भाजप सरकारच्या काळात केवळ एक मंत्रिपदावर जिल्ह्याची बोलवण करण्यात आली होती. पण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जिल्ह्याला तीन मंत्रीपदे मिळाल्याने राज्यात नगर जिल्ह्याचा राजकीय दबदबा वाढत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, ना. शंकरराव गडाख यांना शिवसेनेला पाठिंबा दिला म्हणून मंत्रिपदाची संधी मिळाली मात्र ना. प्राजक्त तनपुरे यांना मंत्रीपदाची संधी देण्याचा कोणता निकष लावण्यात आला असा सवाल आता जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांसह आमदारांच्या समर्थकांकडून उपस्थित होत आहे.
ना. तनपुरेंना केवळ राष्ट्रवादी कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांचे भाचे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे असल्यामुळे मंत्रीपदाची संधी मिळाल्याचे सांगण्यात आले असले तरी ही गोष्ट जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांसह आमदारांच्या समर्थकांना अमान्य आहे.
त्यामुळे आमदार रोहित पवार, आमदार संग्राम जगताप, आमदार नीलेश लंके, आमदार आशुतोष काळे समर्थक नाराज झाले आहे. रोहित पवार यांनी जिल्ह्याचे मातब्बर मंत्री असलेले प्रा. राम शिंदे यांचा तब्बल 42 हजार मतांनी पराभव केला. तसेच नीलेश लंके यांनी उपसभापती विजय औटी यांचा 60 हजार मतांनी पराभव केला. तसेच संग्राम जगताप हे दोन वेळा आमदार झाले. आशुतोष काळे यांनी निसडता विजय मिळवून पक्षाचे संख्याबळ वाढविले. असे सर्व असतांना यापैकी कोणालाही मंत्रीपदची संधी पक्षाकडून दिली गेली नाही. जगताप हे सर्वात वरिष्ठ आमदार सध्या पक्षात आहे.
त्यामुळे त्यांना ही संधी देणे आवश्यक आहे. पण पक्षाकडून ना. तनपुरेंना मंत्रीपदाची संधी दिली गेली आहे. त्यांना ही संधी देतांना कोणते निकष पक्षाने लावले असा सवाल आता उपस्थित होत आहे. आज पक्षाला संघटना बांधणी करणाऱ्या नेत्यांची आवश्यक आहे. सत्तेच्या माध्यमातून संघटनेला बळ देवून संघटना वाढविण्याचे काम करणाऱ्यास मंत्रीपदाची संधी देणे ही पक्षाची गरज होती. पण ते ना. तनपुरेंकडून होणार का असा प्रश्न आहे.
राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून काम करतांना त्यांना कोणती ठोस कामे करता आली. राहुरीकरांसाठी त्यांनी कोणत्या सेवा व सुविधा देण्याचा प्रयत्न केला. याचा उत्तर नसतानाही त्यांना ही संधी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांसह आमदार समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान ना. तनपुरे हे उच्च विद्याविभूषित असल्याने त्यांना ही संधी देण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांने स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यात नगर जिल्ह्याचा पुन्हा एकदा दबदबा वाढत असल्याचे आजच्या मंत्रीमंडळ विस्तारावरून स्पष्ट केले. यापूर्वी कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्याला तीन मंत्रीपदे होती. पण भाजप सरकारच्या काळात एक मंत्रीपद मिळाले होते. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय दबदबा कमी झाला असल्याचे दिसत होते. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये तब्बल तीन मंत्रीपदे मिळाली आहे. थोरात यांच्या पाठोपाठ जिल्ह्यात कोणाला मंत्रीपद मिळणार याबाबत उत्सुकता होती. शिवसेनेकडून ना. शंकरराव गडाख यांना संधी मिळाला हे निश्चित होते. पण राष्ट्रवादीकडून सहा पैकी कोण असा प्रश्न होता. पण त्यावर आज तनपुरेंच्या नावामुळे पूर्णविराम मिळाला आहे.