ग्रामविकास व स्वच्छतेलाही प्राधान्य
सातारा (प्रतिनिधी) – गडचिरोली जिल्ह्यात प्रचंड विरोध असूनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यसनमुक्तीच्या कामाला मोठ्या जोमाने सुरुवात केली. तेथील भौगोलिक, शैक्षणिक परिस्थिती पाहत सिंह यांनी उचललेले पाऊल अनेकांना धाडसी वाटत होते. मात्र, त्यांनी दूरदृष्टीने गडचिरोली जिल्ह्यातील तरुणाईला व्यसनांपासून परावृत्त केले. त्याला डॉ. अभय बंग यांची साथ लाभल्याने सिंह यांचा हा उपक्रम रोल मॉडेल म्हणून नावारूपास आला. हाच पॅटर्न आता सातारा जिल्ह्यात राबवला जाणार असल्याने गेली अनेक वर्षे व्यसनमुक्तीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे.
शेखर सिंह हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून नोकरी, व्यवसायानिमित्त त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले आहे. सिंह हे 2012 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे प्रांताधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेस प्रारंभ केला. तेथे केलेल्या उत्कृष्ट कामाची पोचपावती म्हणून त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बढती मिळाली. सिंदुधुर्ग जिल्ह्यात त्यांनी ग्रामविकास आणि स्वच्छतेला प्राधान्य देत त्यात यशदेखील मिळवले. त्याचे फलित म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छतेत देशात आणि राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील कामगिरीनंतर त्यांना शासनाने बढती दिली. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात ते जिल्हाधिकारी म्हणून झाले. तेथील आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जाताना सिंह यांचे नेतृत्वगुण आणि समाजातील तळागाळातील नागरिकांच्या विकासाची तळमळ दिसली.
गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक विकासाला अडथळे ठरणाऱ्या अनेक गोष्टींचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. त्यात व्यसनाधीनता हे मुख्य कारण असल्याच त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आपला मोर्चा व्यसनमुक्तीच्या दिशेने वळवला. गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला तंबाखू, दारू या व्यसनांपासून दूर करण्याचे काम त्यांनी हाती घेतले. या कामाची दखल घेऊन डॉ. अभय बंग यांनी या कामात रस घेतल्याने सिंह यांच्या व्यसनमुक्तीच्या कार्याला अधिक बळ मिळाले आणि बघता बघता व्यसनमुक्त गडचिरोलीचे मिशन सिंह यांनी यशस्वी केले. गडचिरोलीत आपल्या कामाचा ठसा उमटवून साताऱ्यात दाखल झालेल्या सिंह यांनी आता सातारा व्यसनमुक्त करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यासोबतच ग्रामविकास, स्वच्छता, आरोग्य, रस्ते या कामांना आपले प्राधान्य असेल, असे त्यांनी सांगितले.
हारतुऱ्यांना फाटा, कामाला सुरुवात
सिंह हे शनिवारी दुपारी साताऱ्यात आल्यावर अनेक अधिकारी हारतुरे घेऊन त्यांच्या स्वागताला हजर झाले होते. मात्र, सिंह यांनी त्याला फाटा देत जिल्ह्यातील परिस्थिती आढावा घ्यायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी त्यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला. या कृतीमुळे सिंह हे कर्तव्यकठोर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काम करण्याशिवाय तरणोपाय नाही, हे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आले असेल.