Gadchiroli : गडचिरोलीतील चामोर्शी तालुक्यातुन मोठी बातमी समोर येत आहे. या ठिकणी वैनगंगा नदीमध्ये नाव उलटल्याने सहा महिला बेपत्ता झाल्या असल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासून महिलांचा शोध घेतला जात आहे. पण अद्याप बचाव पथकाला यश आले नाही.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा महिलांचा बुडून मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सहा महिला नदीमध्ये पडल्याची महिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य तात्काळ सुरु करण्यात आले आहे. चामोर्शी तालुक्यातील गणपूरलगत (रै.) वाहणाऱ्या वैनगंगा नदीत ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला मिरची तोडणीला निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांची नाव उलटली. नावाडी पोहून पाण्याबाहेर आला. त्याने एका महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण वाचवण्यात अपयश आले. एका महिलेचा मृतदेह मिळाला आहे.
पाच महिलांचा शोध घेणं अद्याप सुरुच आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याशिवाय ज्या ठिकाणी नाव बुडाली त्या नदी किनाऱ्यावर गावकऱ्यांनी गर्दी केली आहे. पोलिसांकडून बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. 4 तासानंतरही शोधकार्य सुरुच आहे, पण अद्याप यश मिळाले नाही.