गडचिरोली: राज्यात एकीकडे करोनाचे संकट सरकार समोर आहे. तर दुसरीकडे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल्याचे सांगण्यात येत आहे. या चकमकीत आठ ते दहा नक्षलवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या कारवाईमुळे गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
एटापल्ली तालुक्यातील पैडीच्या जंगलात ही घटना घडली आहे. गडचिरोली पोलिसांचे सी-60 च्या कमांडो जवान या भागात नक्षल विरोधी अभियान राबवत होते. त्याच भागात कसनसुर नक्षल दलम कार्यरत असल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, खात्मा करण्यात आलेल्या नक्षवाद्यांची संख्या वाढू शकते. अद्यापही या भागात शोधमोहिम आणि सुरु असून हा संपूर्ण भाग छत्तीसगढच्या सीमेनजीक असल्याची माहिती समोर येत आहे. या भागात नक्षलवाद्यांचा वावर असतो.
काही दिवसांपूर्वीच येथील पोलीस चौकीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. पण, सुदैवाने रॉकेटलाँचरच्या हल्ल्यात कोणतंही नुकसान झाले नाही. यानंतरच पोलिसांनी नक्षलवादविरोधी अभियान राबवले होते . या अभियानाअंतर्गतच येथे गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळच्या दरम्यान ही चकमक झाली. नक्षलवाद्यांचे अनेक म्होरके यामध्ये मारले गेल्याची माहिती आहे.