समीर भुजबळ
वाल्हे – पुरंदर तालुक्यात सीताफळ हे शेतकऱ्यांचे महत्त्वाचे आर्थिक उत्पादनाचे साधन आहे. मात्र, सद्यःस्थितीतील हा हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने तोट्याचा हंगाम ठरत असून सीताफळ, डाळिंब या पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. डाळिंब पिकास तेल्या डांबऱ्या, फळकूज, तसेच सीताफळ फळांवर काळ्या, पांढऱ्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हताश झाला आहे. फ्रूट रॉट आणि ब्लॅक कॅन्कर या बुरशीजन्य रोगामुळे सीताफळ पीक धोक्यात आले आहे.
पुरंदर तालुक्यातील सीताफळ हे देशभरात प्रसिद्ध आहे. तालुक्यातील सीताफळ पावसाळी बहार सध्या अंतिम टप्प्यात आहे. फळ धारणेच्या वेळी शेतकऱ्यांनी केलेल्या चुकांमुळे सीताफळ पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. दरम्यान, सद्यःस्थितीतील वातावरणात या काळ्या बुरशीमुळे सीताफळाच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी बागांवर बुरशीनाशक व कीटकनाशक व बोर्डोमिश्रण ची फवारणी त्वरीत करावी. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात पुरंदर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता. तर यावर्षी अतिअल्प प्रमाणात पाऊस झाला आहे. मात्र, कमी पावसाने आणि धुक्याचा सीताफळांच्या बागांना फटका बसल्याचे दिसून येत आहे.
सीताफळाच्या देठाजवळ काळे डाग पडण्याचे प्रमाण वाढले आहे. हवेतील आर्द्रता आणि रिमझीम पावसामुळे सीताफळाच्या देठाकडील भागात दव आणि पाणी साचून तेथे काळी, पांढरी बुरशी वाढत आहे. फळाच्या त्या भागातील पेशी मृत होतात. त्यामुळे काळे डाग पडण्याचे प्रमाण वाढले असल्याची माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली. पुरंदर तालुक्यातील काही शेतकऱ्यांचा सीताफळ तोडणीचा हंगाम आता अंतिम टप्प्यात असून आता सीताफळास चांगला बाजारभाव मिळत आहे. मात्र, अशा बुरशीजन्य रोगांमुळे फळांची गुणवत्ता घसरली आहे.
दरावर परिणाम
पुरंदर तालुक्यातील बाजारपेठेत बुरशीजन्य फळांना प्रती कॅरेट साधारणतः 200 ते 400 रुपये असा अत्यल्प बाजारभाव मिळत आहे. बाजारामध्ये 30 टक्के काळ्या, पांढऱ्या बुरशीजन्य फळांची आवक होते. फक्त मोठ्या आकाराची काळी फळे ही कमी बाजार भावात खरेदी केली जातात. परंतु लहान आकाराच्या फळांना गोवा व गुजरात आणि इतर बाजारपेठेत कवडी मात्र किंमत मिळत नाही. अशी माहिती सिताफळ व्यापारी यांनी दिली. पुरंदर तालुक्यात चांगल्या प्रतीच्या सीताफळांच्या 20 किलो कॉरेटला 2500 रुपयांपासून ते 3 हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहेत.
5500 हजार एकर क्षेत्र
अयोग्य पद्धतीने छाटणी, जुनी रोगट फळे काढण्याकडे केलेले दुर्लक्ष यामुळे फळांवर काळे डाग पडले आहेत. तालुक्यात सुमारे 5500 हजार एकार सीताफळ क्षेत्र आहे. यामध्ये एकरी 160 झाडे असून तालुक्यात जवळपास 8 लाख 80 हजार सीताफळाची झाडे आहेत.
कधी होऊ शकते ही बुरशी ?
- तापमान 15 ते 20 अंश सेल्सिअस असल्यास
- सहा तासांपेक्षा जास्त ओलावा राहिल्यास
- वातावरणातील आद्रता जास्त असल्यास
- धुक्याचे व दवबिंदुं चे प्रमाण असल्यास
- अती किंवा रिमझीम पाऊस असल्यास
हा उपाय करा
फळांवर काळ्या, पांढऱ्या बुरशीचा प्रादुर्भाव आढळल्यास कॉपर ऑक्सीक्लोराईड 2.5 ग्रॅम पाण्यातून फवारावे. किंवा बोर्डोमिश्रण एक टक्का या बुरशीनाशकांचे त्वरित फवारणी करावी. झाडाच्या आकाराच्या 30 टक्के भागाचे छाटणी करावी; रोगट फळे व फांद्या पूर्णपणे छाटाव्यात व बाग स्वच्छ ठेवावी.