रावणगाव -पूर्वी जर गावातील किंवा बाहेरील गावातील कोणाची मयत झाली तर मोठ्या संख्येने लोक अंत्यविधी, तसेच दशक्रियाविधीसाठी उपस्थित राहायचे. आता जरी शेजारी, तसेच गावातील किंवा इतर गावात राहणाऱ्या एखाद्या नातेवाइकाचा आजाराने किंवा वयोमानाने मृत्यू झाला तर त्यांच्या अंत्यविधी तसेच दशक्रिया विधी कडे आता त्यांचे नातेवाईक, मित्र किंवा गावातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, नेते मंडळी, भावकी यांनी पाठ फिरवल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
सध्या करोना या विषाणूजन्य आजाराने जगभर थैमान घातले आहे. करोना हा आजार झपाट्याने पसरत आहे. यामुळे त्याचा प्रसार रोखण्याकरिता संपूर्ण भारतातील सर्व राज्यात लॉकडाउन करण्यात आले आहे. संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला आहे. तसेच प्रशासनाकडून घराबाहेर न पडणे, गर्दीची ठिकाणे टाळणे, सतत हात स्वच्छ धुणे याबाबत सूचना देण्यात येत आहेत. जेणे करुन करोनाचा संसर्ग रोखला जाईल. काही लोक निमित्त काढून बाहेर पडत आहेत. त्यांना पोलिसांकडून प्रसाद मिळत आहे. तर अनेकांनी करोनाची धास्ती घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही जण घरात बसून राहणेच पसंत करत आहेत.
करोना होऊ नये म्हणून आता बरेच जण स्वत:ची काळजी घेत आहेत. परंतु गावात मयत झाल्यावर पूर्वी नातेवाईक, गावकरी आणि मित्रांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. आता करोनाचे संकट असल्यामुळे प्रत्येक जण काळजी घेत आहे. जर सध्याच्या स्थितीत गावात मयत झाले तर त्या ठिकाणी प्रशासन आणि गावातील पोलीस पाटील गर्दी होणार नाही यांची दखल घेत आहेत.
पाच, दहा लोकांमध्येच विधी करण्याची वेळ
गावात पूर्वी मयत झाल्यावर त्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी नातेवाईक, भावकी, मित्रमंडळी तसेच गावकरी येत होते. परंतू सध्या करोनाचे संकट असल्यामुळे ज्या घरात मयत होत आहे, तेच आता कोणालाही न कळवता मयतीचा विधी लवकर उरकून घेत असल्याचे चित्र ग्रामीण भागातून दिसत येत आहे.
ग्रामीण भागातील कुटुंबाचे नातेवाईक हे शहरात राहण्यास असल्यामुळे त्यानांही मयत झाले आहे हे कळवले जात नाही, त्यामुळे घरातील मोजकेच दहा, पाच नातेवाईक आणि शेजारील काही लोक मिळून ग्रामीण भागातील मयत विधी उरकून घेत आहेत.