- पुणे जिल्ह्यातील 11 लाख कुटुंबांपर्यत पोहचणार
पिंपरी – अयोध्या येथे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने होत असलेल्या श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य सध्या गतिमान झाले आहे. या कार्यासाठी देशभरात 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान निधी समर्पण अभियान होणार आहे. राज्यात हे अभियान 15 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे. या अभियानातंर्गत पुणे जिल्ह्यात 11 लाख कुटुंबापर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अभियानासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने सहकार्य करावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी मंगळवारी (दि. 12) पत्रकार परिषदेत केले.
पत्रकार परिषदेला कीर्तनकार मारोतीबुवा कुऱ्हेकर, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष (देहू) मधुकर महाराज मोरे, प्रांत अभियान सहप्रमुख मिलिंद देशपांडे, पुणे विभाग संघचालक संभाजीराव गवारे आदी उपस्थित होते. अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी केंद्र शासनाने श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना केली आहे. श्री रामजन्मभूमीच्या जागी 5 ऑगस्ट 2020 ला भूमिपूजन व शिलापूजन करून कार्याचा श्रीगणेशा करण्यात आला.
एकूण तीन ते साडेतीन वर्षांच्या कालावधीत मंदिराचे काम पूर्ण होईल. त्यासाठी लागणारा निधी संकलित करण्यासाठी देशभरात 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान निधी समर्पण अभियान होणार आहे. या माध्यमातून देशातील 4 लाख गाव तसेच 11 कोटी कुटुंबापर्यंत पोहचण्याचे नियोजन केले आहे.
महाराष्ट्र राज्यात 15 ते 31 जानेवारीदरम्यान हे अभियान होणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून 45 हजार गावातील व शहरी भागातील सर्व वस्तीतून अडीच कोटी कुटुंबांपर्यत पोहचण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यासाठी 5 हजार संत आणि अडीच लाख कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.
पुणे जिल्ह्यात 1500 गावातील 250 शहरी वस्तीमधील 11 लाख कुटुंबापर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अभियानाचे लक्ष्य गाठण्यासाठी 12 हजार कार्यकर्ते पूर्णवेळ कार्यरत राहणार आहेत.