माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचा आरोप
नवी दिल्ली – तेल कंपन्या दैनंदिन पातळीवर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवून शुद्ध नफेखोरी करीत आहेत, असा आरोप माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला आहे. लॉकडाऊनमुळे लोक अडचणीत असतानाच तेल कंपन्या आणि केंद्र सरकार नफेखोरी करीत असल्याचे ते म्हणाले.
एकीकडे केंद्र सरकार अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी नागरिकांना आणि उद्योगांना 20 लाख कोटी रुपयांच्या सवलती जाहीर करीत आहे. तर दुसरीकडे मोटरसायकल, स्कूटर, रिक्षा इत्यादीच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्यांना बेफाम दरवाढीद्वारा अडवणूक करण्यात येत आहे. आज एकविसाव्या दिवशी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे.
आपण स्वतः अर्थमंत्री होतो, त्यामुळे काही वेळा परिस्थिती अशी निर्माण होते की, त्यावेळी इंधनाच्या दरात वाढ करावी लागते. मात्र, सध्याची एकूण परिस्थिती पाहता तेल कंपन्या ज्या पद्धतीने एकतर्फी दरवाढ करीत आहेत ही सरळसरळ नफेखोरी आहे. जगभर सध्याच्या परिस्थितीत सामान्य नागरिकांना मदत व्हावी, यासाठी सरकारे प्रयत्न करीत आहेत. मात्र भारतातील सरकार अडचणीच्या काळातच नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने वागत आहे.
सध्या जागतिक बाजारपेठेत क्रुडचे दर केवळ 40 डॉलर प्रति पिंप पातळीवर आहेत. हे दर एकेकाळी शंभर डॉलरच्या वर गेले होते. सध्या क्रुडचे दर कमी असूनही तेल कंपन्या दरवाढ करीत आहेत. लॉकडाऊनच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुडचे दर 20 डॉलरपर्यंत कमी झाले होते. त्या काळात भारतातील तेल कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करून ठेवली आहे. त्या काळात कोणी वाहनांचा वापर करीत नव्हते. त्यामुळे 82 दिवस कंपन्यांनी दरवाढ केली नव्हती. मात्र 7 जूनपासून कंपन्यांनी रोज दरवाढ सुरू केली आहे. 7 जूनच्या अगोदर केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात मोठी वाढ केली आहे.
पाकिस्तानात पेट्रोल दरात 25 रुपयांनी वाढ
पाकिस्तानमध्ये शनिवारी पेट्रोलच्या दरात 25 रुपयांनी वाढ करून येथील पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लिटर केले आहेत. डिझेलच्या दरात 21 रुपयांची वाढ केल्यामुळे तेथे डिझेलचे दर 101 रुपये प्रति लिटर झाले आहेत. जागतिक बाजारात इंधनाचे दर वाढल्यामुळे हे दर वाढविण्यात आले असल्याचे पाकिस्तान सरकारने म्हटले आहे. पाकिस्तानकडे परकीय गंगाजळी कमी आहे. त्यामुळे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून कर्ज घेतले आहे.त्यामुळे नाणेनिधीच्या सूचनेनुसार इंधनाचे दर वाढत असल्याचे सांगण्यात आले.
ऑइल इंडियाला नफा
ऑइल इंडिया या सरकारी तेल कंपनीने चौथ्या तिमाहीचा ताळेबंद जाहीर केला. या तिमाहीत कंपनीला 925 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीला 208 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. मार्च महिन्यानंतर तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे आगामी काळात या कंपन्यांच्या नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.