पुणे – नवरात्रौत्सवामुळे मार्केट यार्डात फळांची आवक वाढली आहे. विशेषत: सफरचंद, डाळींब, पपई, पेरू, चिकू, सीताफळ, संत्रा आणि मोसंबीला मागणी वाढली आहे. आवकेच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे बहुतांश फळांचे भाव सुमारे 20 टक्क्यांनी वाढले आहेत. दसऱ्यापर्यंत हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सफरचंद : हिमाचल प्रदेशातील हंगाम संपत आल्याने या फळाची आवक नगण्य आहे. 25 ते 27 किलोच्या पेटीला 3 ते साडेचार हजार रुपये भाव मिळत आहे. काश्मीरमधून दररोज 7 ते 8 गाड्या येत आहेत. सफरचंदांच्या 13 ते 19 डझनाच्या पेटीला 1,200 ते 2,000 रुपये भाव मिळत आहे. सध्या मागणी वाढली आहे. भाव स्थिर आहेत, अशी माहिती व्यापारी राजू भोले यांनी दिली.
डाळींब : बाजारात मागणीच्या तुलनेत डाळिंबाचा तुटवडा आहे. त्यामुळे भाव आधीपासूनच तेजीत आहेत. सध्या 30 ते 35 टन आवक झाली आहे. घाऊक बाजारात गणेश डाळींबाला किलोला दर्जानुसार 10 ते 35 रुपये, आरक्ताला 20 ते 80, भगव्याला 120 ते 300 रुपये भाव मिळत आहेत. त्यात सरासरी 20 टक्के भाववाढ झाली आहे, अशी माहिती व्यापारी सिद्धार्थ खैरे यांनी दिली.
चिकू : पुणे जिल्ह्यासह सोलापूर आणि कर्नाटकातून आवक होते. सध्या दररोज 8 ते 10 टन आवक होत आहे. मागणी अधिक असल्याने भावात तेजी आहे. 10 किलोला 200 ते 800 रुपये भाव मिळत असल्याचे व्यापारी ज्ञानोबा बिराजदार यांनी दिली.
पेरू : आरोग्यास गुणकारी मानला जाणाऱ्या पेरूच्या भावातही सरासरी 20 टक्के वाढ झाली आहे. सध्या 20 किलोला दर्जानुसार 400 ते 800 रुपये भाव मिळत आहे.
सीताफळ : सध्या दर्जानुसार किलोस 20 ते 120 रुपये भाव मिळत आहे. मागणी वाढल्यामुळे भावात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, पपईला किलोला 20 ते 50 रुपये भाव मिळत आहे, असे व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी सांगितले.
संत्री, मोसंबी : भावात 20 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. या दोन्ही फळांची नगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतून अनुक्रमे 20 ते 25 टन आणि 70 ते 80 टन आवक होत आहे. 3 डझन मोसंबीला 120 ते 350 रुपये, 4 डझन मोसंबीला 40 ते 120 रुपये भाव आहे. तर 10 किलो संत्र्याला दर्जानुसार 150 ते 800 रुपये भाव मिळत असल्याचे व्यापारी सोनू ढमढेरे यांनी सांगितले.
नवरात्रोत्सव काळात दरवर्षी फळांना मागणी असते. त्याप्रमाणे यंदाही मागणी वाढली आहे. त्यामुळे आवक वाढूनही सर्व प्रकारच्या फळांच्या भावात सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. – अरविंद मोरे, व्यापारी, मार्केट यार्ड