पुणे – इयत्ता बारावीच्या 40 टक्के व सीईटीच्या 60 टक्के याप्रमाणे गुणांना महत्त्व देऊन व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा नव्या फॉर्म्युल्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
विद्या प्राधिकरणातील पत्रकार परिषदेत बोलताना केसरकर यांनी ही माहिती दिली. इयत्ता बारावी व सीईटी परीक्षेच्या प्रत्येकी 50 टक्के गुणांच्या आधारे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश देण्याबाबत मागच्या सरकारच्या कालावधीत सकारात्मक चर्चा झाली होती. मात्र, त्यावर काहीच ठोस निर्णय मात्र झाला नव्हता. आता पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे.
कनिष्ठ महाविद्यालये व कोचिंग क्लासेस यांच्यात “टाय-अप’ असल्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात गैरहजर राहतात अन् खासगी क्लासमध्ये नियमितपणे उपस्थित राहतात. विद्यार्थी बारावीच्या अभ्यासक्रमाला फारसे महत्त्वही देत नाही. केवळ सीईटीच्या गुणांवर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळत असल्याने विद्यार्थी क्लासेसमध्ये सीईटी परीक्षांचा अभ्यास करतात. या पार्श्वभूमीवर प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकात पाटील यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन त्यावर चर्चा करण्यात येणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले आहे.
क्लासेसला महाविद्यालयाची परवानगी…
खासगी क्लासेसवाल्यांनी स्वत:चे कनिष्ठ महाविद्यालय सुरू करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करावे. यासाठी क्लासेसवाल्यांनी महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी मागितल्यास त्यांना परवानगी देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.