सध्या आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत. या वर्षातील प्रजासत्ताक दिनालाही म्हणूनच खूप महत्त्व आहे. हा सोहळा अनेक अर्थांनी वेगळा ठरावा म्हणून त्यात अनेक बदल करण्यात येत आहेत. परंपरेने सुरू असलेले अनेक उपक्रम बदलले जात आहेत. पूर्वी 24 जानेवारीपासून प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा होत असे, यंदा तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीलाही जोडून घेण्यासाठी 23 जानेवारीपासूनच सुरू करण्यात आला आहे. 29 जानेवारीला या दिनाची सांगता बिटींग रिट्रीट या कार्यक्रमाने होते. त्यातील पूर्वापार चालत असलेली धून बदलण्यात आली असून त्या जुन्या स्कॉटिश गीतकाराच्या धुनेची जागा आता “ए मेरे वतन के लोगो’ या गीताने घेतली आहे. प्रत्यक्ष संचलनातही अनेक बदल करण्यात आले आहेत. साउथ आणि नॉर्थब्लॉकच्या इमारतींवर होणारे लेझर शो, एक हजार ड्रोनच्या सहाय्याने होणारी प्रात्यक्षिके ही नवीन आकर्षणे त्यात असतील.
यंदाच्या संचलनात लष्कर व हवाईदलाच्या 75 विमानांचा एक आगळा शो ही होणार आहे. दरवर्षी सकाळी दहा वाजता राजपथावरील हा कार्यक्रम सुरू होत असतो त्याची वेळही यावेळी बदलण्यात आली आहे. यंदा साडेदहा वाजता हा सोहळा सुरू होणार आहे. दिल्लीतील धुक्याच्या वातावरणामुळे हा बदल केला जात असल्याचे अधिकृत पातळीवरून सांगण्यात येत आहे. दरवर्षी सुमारे सव्वालाख लोक या कार्यक्रमाला उपस्थित असतात. यंदा केवळ 24 हजार लोकांनाच तेथे अनुमती दिली जाणार असून त्यातील 19 हजार जण निमंत्रित असतील. हा बदल कोविडमुळे केला गेल्याचे सांगितले जात आहे. भारतीय प्रजासत्ताकाचा हा सोहळा सर्व देशाचा सोहळा आहे.
तो एक महत्त्वाचा राष्ट्रीय दिन असल्याने या सोहळ्याचा सर्वांनाच सार्थ अभिमान असतो. सारा देश एकजुटीने सरकार, लष्कर आणि एकूणच प्रजासत्ताकाच्या बाजूने उभा असतो. या सोहळ्याला सहसा राजकीय वादाचे गालबोट लावण्याची प्रथा नाही. किंबहुना जरी काही खटकले तरी ते दुर्लक्षित करून एकोपा कायम राहील असा सर्वांचाच प्रयत्न असतो. या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरच पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने या सोहळ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेले काही बदल मतभेदाचे मुद्दे ठरले आणि त्यावर जाणीवपूर्वक चर्चा घडवून आणली गेली, हे मात्र यंदा प्रथमच घडले आहे. विशेषत: ऐन प्रजासत्ताकदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इंडिया गेटवर गेली 50 वर्षे प्रज्वलित ठेवण्यात आलेली अमर जवान ज्योत विझवली गेली.
सरकारच्या मते ही ज्योत विझवली गेली नाही, तर ती दुसऱ्या ज्योतीत विलीन केली गेली आहे. आक्षेप आणि सरकारचा खुलासा काहीही असो, पण यातून एक जोरदार वादंग देशात झाले. आता इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवला जाणार आहे. त्या अनुषंगानेही मोठा डामडौल माजवला गेला आहे. दिल्लीत आणि देशात अन्यत्र नेताजींची काही कमी स्मारके किंवा पुतळे नाहीत. अनेक ठिकाणी नेताजींच्या नावाने नगरे उभी आहेत, स्टेडियम उभी आहेत, विमानतळे आणि रेल्वे स्थानकांनाही नेताजींची नावे आहेत, नेताजींच्या नावाने उच्चशिक्षण संस्था आहेत, रुग्णालये आहेत आणि ही सर्व ठिकाणे खूप पूर्वीपासूनची आहेत. अगदी नेमक्या भाषेत सांगायचे तर कॉंग्रेसच्या काळातच ही सारी स्मृती स्थळे विकसित केली गेली आहेत.
पण तरीही दिल्लीत उभारल्या जाणाऱ्या नेताजींच्या पुतळ्याच्या अनुषंगाने असे जाणीवपूर्वक भासवले गेले आहे की, देशात आतापर्यंत केवळ एकाच परिवाराचा उदोउदो केला गेला असून नेताजींकडे आजवर जे दुर्लक्ष झाले त्या चुकीची दुरुस्ती म्हणून दिल्लीत नेताजींचा हा पुतळा बसवला जाणार आहे. नेताजी आणि नेहरूंमध्ये असलेल्या मतभेदांचीही दूरचित्रवाणी वाहिन्यांवर मोठी चर्चा घडवली गेली आणि नेहरूंना कमी लेखून नेताजींचा उदोउदो केला गेला. आजवर नेताजींच्या कार्याविषयी सर्वांच्याच मनात आदराची भावना राहिली आहे. त्यांच्या कार्याचा देशाला कधीही विसर पडलेला नाही किंवा त्यांना दुर्लक्षितही करण्याचा प्रयत्न झालेला नाही. देशाने आजवर नेहमीच नेताजी बोस यांचे कृतज्ञतेने स्मरण केले आहे. पण तरीही नेहरू आणि नेताजी यांच्यातील कथित मतभेदांचे भांडवल केले गेले,
इतिहासातील संदर्भ तोडून मोडून सांगितले गेले आणि या दोन महान राष्ट्रपुरुषांमध्ये एकाची बाजू घेऊन दुसऱ्याला झुंजवले गेले हे काही बरे झाले नाही. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील प्रजासत्ताक दिनाला जाणीवपूर्वक लावण्यात आलेले हे गालबोट खऱ्या राष्ट्रप्रेमी नागरिकांना दुखावणारे ठरले. हल्ली देशात सध्या काय चालले आहे त्यावर कोणाला काही बोलूच दिले जात नाही. देशाची रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था, देशातील सर्वच घटकांमधील वाढलेले आत्महत्यांचे प्रमाण, जवळपास आठ टक्क्यांवर पोहोचलेला बेरोजगारीचा दर, बंद पडलेले हजारो उद्योग, कनिष्ठ मध्यमवर्गातून पुन्हा दारिद्य्ररेषेखाली गेलेली कोट्यवधी कुटुंबे या साऱ्यांवरील चर्चा सध्याच्या सत्ताधाऱ्यांना सोयीची नाही. त्यामुळे मग पुन्हा इतिहासात तोंड खुपसून जुन्या विषयांना नव्याने फोडणी देऊन
चर्चेचा रोख दुसरीकडेच वळवण्याचा हा जो खटाटोप सुरू आहे तो निराश करणारा आहे. स्वातंत्र्यलढ्यातील इतिहास पुरुषांमध्ये तत्कालीन स्वरूपांमध्ये काही मतभेद जरूर होते. पण हे मतभेद खुलेपणाने मान्य केले गेले आहेत. एकमेकांविषयी पूर्ण आदर भावना ठेवून आपले मतभेद स्पष्टपणे नोंदवणे हे त्यावेळच्या राष्ट्रपुरुषांमधील एक विलोभनीय वैशिष्ट्य होते. त्यावर अधिकृत पत्रव्यवहार आणि शेकडो पुस्तकेही लिहिली गेलेली आहेत. पण हे मतभेद आज वेगळ्या स्वरूपात सादर करून पटेल-बोस यांना नेहरू-गांधींच्या विरोधात नव्याने लढवण्याचा जो उद्योग चालू आहे तो देशहिताचा नाही.
यातून ना देशाचे भले होणार आहे, ना समाजाचे. या विषयांचे भांडवल करून आज जनतेलाच एकमेकांच्या विरोधात झुंजवण्याचा प्रकार संतापजनक ठरत आहे. राष्ट्रप्रेमी जनतेनेही आता राजकारण्यांचा हा कावेबाजपणा वेळीच ओळखून त्यांच्या डावावर न जाता आपली सद्सद्विवेकबुद्धी कटाक्षाने जागरूक ठेवण्याची सर्वाधिक गरज आहे. भारताच्या या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन वर्षातील प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी हाच धडा स्मरणात ठेवणे अधिक गरजेचे वाटते आहे.