कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंजाबातील पेचप्रसंगावर अत्यंत शिताफीने तोडगा काढून तेथे निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसमधील एकोप्याचे काल लुधियानात चांगले दर्शन घडवले आहे. याचा पक्षाला तेथे निश्चितच लाभ होणार आहे, पण हा एकोपा पूर्ण पाच वर्षे टिकेल काय, हा प्रश्न आता लोकांच्या मनात उपस्थित होऊ लागला आहे. मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील तेढ हा एक राष्ट्रीय चर्चेचा विषय झाला होता.
ऐन निवडणूक काळात ही तेढ पक्षाच्या मुळावर येणार असल्याचे वातावरण होते. त्यामुळे ही तेढ वाढू नये म्हणून कॉंग्रेसश्रेष्ठी नेहमीच्या शेैलीने त्याकडे दुर्लक्ष करतील आणि आहे त्याच स्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पाडतील असेच वातावरण होते. पण मागच्या पंधरा दिवसांपूर्वी खुद्द राहुल गांधी यांनी पंजाबात कॉंग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार लवकरच जाहीर केला जाईल, अशी जाहीर घोषणा करून सर्वांनाच चकित केले होते.
चन्नी किंवा सिद्धू या दोघांपैकी कोणाही एकाचे नाव जाहीर केले तरी दुसरा खवळून उठणार असेच वातावरण असल्याने राहुल गांधी यांची घोषणा पक्षाला आणखीनच अडचणीत टाकणारी ठरेल, असा बहुतेकांचा समज होता. पण राहुल गांधी यांनी ज्या आत्मविश्वासाने ही घोषणा केली, त्याच आत्मविश्वासाने त्यांनी हा पेच सोडवत मुख्यमंत्रिपदासाठी चन्नी यांचे नाव घोषित केले आणि विशेष म्हणजे त्यांच्या या घोषणेला चक्क नवज्योतसिंग सिद्धू यांनीही जाहीर पाठिंबा दर्शवला. लुधियानातील कार्यक्रमाच्या व्यासपीठावरच या दोघांची गळा भेट झाली आणि चन्नींनीही सिद्धूंचे चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. हा चमत्कार पाहून उपस्थित कॉंग्रेसजनही चक्रावून गेले. राहुल गांधी यांच्या नेतृत्व कौशल्याचीही यानिमित्ताने चुणूक पाहायला मिळाली.
अन्यथा सिद्धू यांच्या सारख्यांना गप्प करणे हे सोपे काम नाही. पंजाब हा एकमेव असा प्रांत आहे की जिथे सुदैवाने कॉंग्रेसला प्रबळ असा राजकीय विरोधकच अस्तित्वात नाही. अकाली दल हा कॉंग्रेसला पर्याय ठरू शकला असता; पण त्यांनी ही निवडणूक सोडून दिल्यासारखीच त्यांची स्थिती आहे. ते हिरीरीने स्पर्धेतच उतरलेले दिसले नाहीत. याचे कारण काय असावे हे समजायला मार्ग नाही; पण आज हा पक्ष तेथील स्वत:चे अस्तित्वच गमावून बसल्यासारखे वातावरण आहे. भारतीय जनता पक्षाचे तेथील अस्तित्व केवळ नाममात्र आहे. माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे बंडखोर नेते कॅ. अमरिंदरसिंग हे तेथे कॉंग्रेसला मोठे आव्हान देऊ शकतील असे वाटले होते; पण त्यांच्याही आव्हानात प्रभाव दिसला नाही. कॉंग्रेसच्या विद्यमान आमदारांमध्ये ते मोठी फाटाफूट करू शकले नाहीत.
भारतीय जनता पक्षाने अमरिंदरसिंग यांच्या पक्षाशी आघाडी करून थोडाफार तग धरण्याचा प्रयत्न केला आहे इतकेच. या साऱ्या वातावरणात कॉंग्रेसला एकतर्फी चाल मिळेल असे वाटत असतानाच चन्नी आणि सिद्धू यांच्या वादामुळे पक्षाच्या हातून हे सहज सोपे राज्यही निसटून जाईल की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. तेथे आम आदमी पक्षाने कॉंग्रेसपुढे दमदार वातावरण निर्मिती केली आहे. त्या पक्षाने खासदार भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करून कॉंग्रेसपुढील आव्हान आणखी मजबूत केले होते. आता मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्याची अवघड कसोटी कॉंग्रेसपुढे होती.
वास्तविक कॉंग्रेसने आजवर कोणत्याच राज्यात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करून निवडणूक लढवलेली नाही. पण पंजाबात सर्वांनीच ही मागणी केल्याने कॉंग्रेसला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करून येथे प्रथमच निवडणूक लढवावी लागणार होती. पण पक्षातील विद्यमान स्थितीत हे काम कठीण होते. विशेष म्हणजे सिद्धू आणि चन्नी यांच्या स्पर्धेत सुनील जाखड हे तिसरे नावही अचानक पुढे आल्याने हा मामला आणखीनच बिकट बनला होता. चन्नी आणि सिद्धू यांच्यातील स्पर्धा विकोपाला गेली असताना जाखड यांनी पक्षात आपल्यालाही दुसऱ्या क्रमाकांची पसंती कॅ. अमरिंदरसिंग यांच्यावेळी घेण्यात आलेल्या सर्व्हेच्यावेळी मिळाली होती, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. त्यामुळे कॉंग्रेस निवडणुकीपूर्वीच तीन गटांत विभागली गेली असल्याचे वातावरण निर्माण झाले होते.
त्यातूनच समोर प्रबळ विरोधक नसल्याने सोपी असणारी निवडणूकही कॉंग्रेस गमावणार अशी भीषण स्थिती पक्षापुढे उद्भवली असतानाच मुख्यमंत्रिपदावर दावा सांगणाऱ्या तिन्ही नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्यात एकोपा घडवत चन्नींच्या नावाची घोषणा करण्याचे कौशल्य काल राहुल गांधींनी दाखवल्याने कॉंग्रेसच्या पंजाबातील आशा कायम राहिल्या आहेत. आता कॉंग्रेसपुढील प्रश्न असा आहे की, ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेला एकोपा पुढील किती काळ टिकणार. सिद्धूंच्या महत्त्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाहीत, कॉंग्रेस सत्तेवर आली तरी हे महाशय सहजी कोणाच्या आटोक्यात राहण्याची शक्यता दिसत नाही.
कारण कालच चन्नींच्या नावाला पाठिंबा देताना त्यांनी असे विधान केले आहे की, मी चन्नींना पाठिंबा जाहीर करीत असलो तरी माझा वापर केवळ शो-पिस म्हणून केला जाऊ नये. त्यांचे हे विधान सूचक आहे. हे काहीही असले तरी पंजाबातील सत्ता कायम राखणे कॉंग्रेसला पुढील भवितव्यासाठी आवश्यक आहे. ज्या राज्यात भाजपचे अस्तित्व केवळ नाममात्र स्वरूपात आहे त्या राज्यातही कॉंग्रेस जिंकणार नसेल तर कॉंग्रेस देशात इतक्यात समर्थपणे उभी राहूच शकणार नाही, असे मत अनेक राजकीय जाणकारांनीही व्यक्त केले होते. त्यामुळे पंजाबातील लढाई ही कॉंग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे.
ती जिंकण्यासाठी पक्षांतर्गत एकोप्याचे दर्शन घडवणे ही पूर्व अट होती. ही अट काल लुधियानात कॉंग्रेसने पूर्ण केली आहे. आता तेथे त्यांना आम आदमी पक्षाने निर्माण केलेले आव्हान पार करायचे आहे. पंजाब हे दिल्ली शेजारचेच राज्य असल्याने आणि दिल्लीत आम आदमी पक्षाने केलेले कार्य पंजाबी नागरिकांच्या समोर असल्याने त्यांना आम आदमी पक्षाविषयी जवळीक वाटू लागली आहे. ही जवळीक मतात परावर्तीत करण्याचे आव्हान आम आदमी पक्षाला पेलायचे आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करून पक्षातील ऐक्याचे दर्शन घडवण्याची जी यशस्वी कामगिरी कॉंग्रेसने केली आहे ती सत्तेच्या पुनरागमनासाठी किती लाभदायी ठरणार आहे, हे आता पाहावे लागेल.