जालना – मनोज जरांगे यांनी आजपासून सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषण स्थळी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी संभाजीराजे यांनी शिवरायांचे वंशज म्हणून मनोज जरांगे यांना तब्येतीची काळजी घेत पाणी घेऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. यावेळी जरांगे यांनी आजचा दिवस पाणी पिऊन आपण राजेंचा शब्द मोडत नसल्याच सांगितले. आज पाणी ग्रहण केले मात्र उद्यापासून आपण पाणीही घेणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला 40 दिवसांच्या मुदतीत आरक्षण न दिल्याने आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले. आंतरवाली सराटीत सकाळपासून आंदोलनाला सुरूवात केली. अन्नपाणी, उपचार घेणार नाही आणि सलाईनही लावू देणार नाही, असा निर्धार त्यांनी केला. त्याचप्रमाणे, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळेल ही आशा फोल ठरली, असे ते म्हणाले. सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. हिंसक आंदोलन, जाळपोळ तसेच आत्महत्या करू नका, असे आवाहनही जरांगेंनी केले.
आता किती संधी सरकारला द्यायच्या? आरक्षण आमच्या हक्काचे आहे, मी माझ्या जीवाची बाजी लावणार. संवादातून आता प्रश्न सुटणार नाही, आता आरक्षण द्यावे. आज आंदोलनाचा 41 वा दिवस आहे. मुख्यमंत्री यांचा सन्मान केला, मुख्यमंत्री यांच्या शपथेचे कौतुक आहे. पण आम्ही जसा मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला तसा त्यांनी देखील आरक्षण देऊन सन्मान केला पाहिजे, असे जरांगे म्हणाले.