भोपाळ – मध्य प्रदेश हे भ्रष्टाचाराचे केंद्र झाले असून या राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या गेल्या 18 वर्षांच्या शासनकाळात 18 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत असा आरोप करत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील आणि मध्य प्रदेशातील सरकारवर जोरदार प्रहार केला. कॉंग्रेसचे सरकार आल्यावर ओबीसींची संख्या जाणून घेण्यासाठी जातीच्या आधारावर जनगणना केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भारतीय जनता पार्टी समाजात द्वेष पसरवत असल्याचा आरोप करत राहुल म्हणाले की एकीकडे कॉंग्रेस पक्ष, महात्मा गांधी आहेत तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गोडसे आहेत. एकीकडे घृणा आणि हिंसा आहे तर दुसऱ्या बाजूला प्रेम, आदर आणि बंधुभाव आहे. भारतीय जनता पार्टीचे लोक जेथे जातात तेथे द्वेष पसरवतात.
मध्य प्रदेशातील तरूणांना आणि शेतकऱ्यांनाही आता भाजप आवडेनासी झाली आहे. मध्य प्रदेश हे राज्यच भ्रष्टाचाराचे केंद्र झाले आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. तुम्ही शेजारच्या छत्तीसगडमध्ये जाऊन शेतकऱ्यांना काय मोबदला मिळतो याची माहिती घ्या असे आवाहनही त्यांनी केले. आम्ही तेथे जी आश्वासने दिली होती ती पूर्ण केली असून देशाच्या इतिहासात प्रथमच शेतकरी तेथे कर भरत आहेत. आमचे सरकार गरिबांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी काम करते.
राहुल यांच्या भाषणातील ठळक मुद्दे:
* सत्तेत आल्यावर सर्वप्रथम ओबीसींची जनगणना करणार
* केवळ 90 अधिकारी देश चालवत आहेत.
* देशाचे कायदे आणि धोरणे तयार करण्यात भाजपच्या खासदार, आमदारांची कोणतीही भूमिका नसते
* संघाचे सदस्य आणि नोरकशहाच देशाचे कायदे ठरवत आहेत
* मध्य प्रदेशात एमबीबीएसच्या जागा विकल्या जात आहेत, परिक्षांचे पेपर फुटत आहेत, मुलांचे भोजन, गणवेष सगळ्यांत भ्रष्टाचार होतो आहे.