मैत्र हा अगदी सहजतेनं, नकळत उमलून येणारा योग आहे. बऱ्याचदा एखाद्या समवयस्क, समविचाराच्या व्यक्तीशी मैत्री जुळली की ती आयुष्यभरासाठी असते. जसं की एखादं छोटूकलं रानफूल, त्याचे सकवार रंग, त्याच्याभोवती भिरभिरणारी इवलाली फुलपाखरं, एखादी निवांत संध्याकाळ, धुक्याची दुलई आणि गंध दरवळ, किती सहजतेनं आवडून जातात. असा एखादाच क्षण असतो, या साऱ्या घटनांना सामोरं जाण्याचा तरी त्या गोष्टी प्रचंड आवडून जातात. मनात घर करतात. तसंच काहीसं जुळलेल्या मैत्रीचं असतं. जितकं सहज, निर्लेप, तितकंच जपलं तर सरळ आणि हवंहवंसं. अगदी थोड्या अवधीत ओळख होते. विचार, आवडी-निवडी जुळतात आणि मैत्रीचे रेशिमबंध विणले जातात.
त्यासाठी वय, भाषा, आर्थिक विभिन्नता कशाचीच आवश्यकता वाटत नाही. अशीच मैत्री टिकते, फुलते आणि आपला परिघ वाढवते. गुलमोहर फुलल्यानंतर त्याच्या पाकळ्या लाल-गुलाबी बहर पांघरतात आणि वाऱ्याच्या झुळकीबरोबर लहरत जाऊन रस्त्यावर गालीचा विणतात. या पाकळ्या आणि वारा यांची मैत्री अशीच उमलत जाते. स्वातीच्या सरी शिंपल्यांमध्ये लपतात आणि मोती जन्माला घालतात. या सरी आणि शिंपले यांची मैत्री मोत्यांच्या सरींनी गुंफली जाते, झळाळून उठतं. अभ्रकाचे अनेक पदरी पापुद्रे असतात… कधीकधी त्या पापुद्य्रांवर सप्तरंग सांडल्याचा भास होतो. तसेच काहीसे मैत्रीचेदेखील असते. मानवी भावनांचे सारे रंग या मैत्रीच्या अभ्रकात अनुभवायला मिळतात. आयुष्याची सुखदु:खाच्या जरींनी भरलेली झोळी कुठेना कुठे रिकामी करणं गरजेचं असतं. अशावेळी हा मैत्रीचा खांदा हक्काचा आणि जवळचा वाटतो.
मला ना तेव्हा आनंद होतो, जेव्हा मला असा कोणी समवैचारिक भेटतो. नवीन मित्र किंवा मैत्रीण भेटणार म्हटलं की, मला अगदी हरखून जायला होतं. आपले विचार, मत शेअर करण्यासाठी कोणीतरी सोबत आहे, हा विचारच किती छान आहे ना! मला नेहमीच काहीतरी बोलायचं असतं, ऐकायचं असतं… प्रतिसादही द्यायचा असतो. कधी कधी ना अशावेळी मला पूर्ण व्यक्त होता येत नाही… कधी वेळ पुरा पडत नाही तर कधी काही सुचतच नाही बोलायला. मग काहीतरी अपूर्ण राहिलंय, खूपसं सांगायचं राहिलंय असंच वाटायला लागतं. पण कधी कधी खूप सुंदर लोक भेटतात. त्यांच्याशी बोलण्याचे योग येतात. हे योगायोगही खूप सुंदर असतात बरं का! उदाहरणार्थ, कोजागिरीची अश्विनातली पोर्णिमा. दरवर्षी आपल्याला को जार्गती म्हणून जागं करते. तसाच पहिला पाउस… दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात भेटणारा मृगाचा पाऊस आणि त्यासोबतची शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी… ही मंडळी न चुकता भेटणारी; पण प्रत्येकवेळी मैत्रीच्या नव्या परिसीमा देणारी.
मी जर मनापासून मैत्री जपणारी असेन, तर समोरच्यानेही ती जपावी ही रास्त अपेक्षा! आपण आपला स्ट्रेस कमी करण्यासाठी प्रेम शोधता, मैत्री शोधता. संवाद हवा असतो म्हणून वेळ देता. आपल्याला जेव्हा सर्वात जास्त ऊर्जेची गरज असते तेव्हा ही मैत्रीच ऊर्जास्रोत बनून आपल्याला सोबत करते. भलेही हे लोक शरीराने जवळ नसतील, काळ-काम-वेग यांच्या त्रैराशीकात गुंतले असतील; पण त्यांच्या नुसत्या सोबतीची जाणीव ही जगण्याला उभारी देऊन जाते. प्रेम, माया, वात्सल्य, मैत्री असे कोणतेही नाव या बंधाला देता येईल; पण या ऊर्जेच्या जोरावरच माणसं तरून जातात.
नियम एकच, मैत्रीत सच्चेपणा पाहिजे. पारदर्शकता, मोकळेपणा पाहिजे. पण हा नियम अगदी प्रेमाने हं… उगीच भेटल्यावर जास्त ओळख नसताना घट्ट मिठ्या मारायच्या, सलगी दाखवायची. या गोष्टी मला अजिबात आवडत नाहीत. खरंतर माझ्यासाठी एका अशा मैत्रीला सुरुवात झालीय… या मैत्रीची सुरुवात मी माझ्यापासून करतेय… म्हणजे मला काय म्हणायचेय ते तुमच्या लक्षात येईल. मला ना लहान मुलासारखं जगायला, स्वत:ला अनुभवायला वेळच मिळत नाही. मग मित्र-मैत्रिणी, देवाण-घेवाण ह्या सगळ्यांसाठी कुठून आणणार? म्हणून मग भेटायचं-आधी स्वत:लाच. जेव्हा मला माझ्यात लपलेली मी सापडेन ना! तेव्हा त्या “मी’ लाच मी माझी मैत्रीण बनवेन. त्याचा आनंद सांगता यायचाच नाही… अक्षरश: युरेका-युरेका!
मला माझ्या या मैत्रिणीला आवडणाऱ्या काही गोष्टी आर्वजून करायच्या आहेत. तिला आवडणारी गाणी ऐकायची आहेत आणि ऐकवायची आहेत. तिच्या आवडत्या विषयांवरची पुस्तकं वाचायचीत, खूप भटकायचंय, तिच्यासोबत आकाशाची निळाई वेचायचीय, तिला कवितेत उतरवायचीय… ह्या आणि अशा कितीतरी गोष्टी तिच्यासोबत खळखळून हसायचंय आणि रडायचंयसुद्धा… मी राहते आजकाल सतत तिच्यासोबत. कितीही घाईगडबडीत असले तरी चांदण्यांनी भरलेलं आभाळ मी रोज एक मिनिट स्तब्ध राहून बघते. तिच्यासाठी आणि मग ज्या खऱ्याखुऱ्या मित्र-मैत्रिणी आहेत त्यांना भेटल्यासारखं होतं. त्यांच्यात मिसळून गिटारवर पुरानी जिन्स और गिटार म्हटल्यासारखं वाटतं.
मनात विचार येतो, की सगळे जण असेच मीस करत असतील का स्वत:ला? स्वत:त लपलेल्या मैत्रीला. जगण्याच्या दैनंदिन लढाईत त्याही काहीतरी साठवत असतील. काही सोडून देत असतील… कधी आठवणीत डोकावत असतील… रोज नव्याने रूजून येत असतील… ह्या सगळ्या माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींना मला पुन्हा हात द्यायचाय माझ्या मैत्रीचा आणि मुठ्ठीभर प्यार व जरासा दुलार देतानाही सांगायचंय, आकाश के उसपार भी आकाश है। चलो दोस्तो खुदसे मिलते है नये सिरेसे… चला तर मग पुन्हा जगूया नव्याने मैत्रीसाठी आणि साजरं करूया जगणं… हे जीवन सुंदर आहे…
मनाचा कप्पा
मानसी चिटणीस