गेल्या काही दशकांपासून हिंदी चित्रपटांमधील संगीताची सातत्याने घसरणच होताना दिसते आहे. एखाद्या चित्रपटातील एखादे गाणे आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर किमान तीन ते चार वर्षे लक्षात राहत असे, तो काळ गेला कुठे? आवारा हूँ, डम डम डिगा डिगा, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, ईचक दाना बीचक दाना, एक चतुर नार अशी सुपरहिट गाण्यांची जंत्रीच सादर करता येईल.
परंतु आज एखादे चित्रपटगीत आपण जेव्हा चित्रपट पाहतो तेव्हाच पहिल्यांदा ऐकतो. तेही चित्रपटगृहातून बाहेर आल्यानंतर नव्वद टक्के प्रेक्षकांच्या लक्षात राहत नाही. एवढेच नव्हे तर चित्रपटगृहातून बाहेर येताना आपण ते गाणे गुणगुणतसुद्धा नाही. यामागे काय कारण असावे? आजकाल एखाद्या चित्रपटात एकाहून अधिक संगीतकार असतात. कधीकधी पाच ते सहा संगीतकार असतात, हे यामागील कारण असावे, असे “माचिस’ या गुलजार यांच्या सुपरहिट चित्रपटाला संगीत देणारे संगीतकार विशाल भारद्वाज यांचे मत आहे. हा असा ट्रेन्ड आहे, जो संगीतकाराची ओळखच हिसकावून घेतो, असे त्यांना वाटते. दुसरीकडे, संगीतकार सलीम मर्चंट सांगतात की, बॉलिवूडमधील संगीतात सध्या ओरिजिनॅलिटीचा म्हणजेच अस्सलतेचा अभाव आहे.
ते म्हणतात, “रिमेक गाणी करण्याच्या मानसिकतेलाच माझा विरोध आहे. बॉलिवूडमधून टाइमलेस धुन आता गायब झाली आहे. भारताच्या मनोरंजन उद्योगाचा संगीत हा महत्त्वाचा भाग आहे. गेल्या पाच वर्षांत चित्रपट उद्योगात खूप बदल झाले आहेत. रॅप गीते आणि रिमिक्स गीते यांची आज चलती असून, संगीतकारांच्या एका विशिष्ट स्थितीचे हे निदर्शक आहे. संगीतकार जुन्या-नव्याच्या मधला मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात असल्याचे यावरून जाणवते. त्यामुळेच जुन्या गाण्याचे नव्या रंगढंगात सादरीकरण करण्याचे आणि त्यातून रिमिक्स किंवा नवे पॉप अल्बम तयार करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत, यात फारसे आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही.
जुन्या काळात गाणे तयार करताना प्रत्येक ओळीवर मेहनत घेतली जात असे. उदाहरणार्थ, श्री 420 चित्रपटातील “प्यार हुआ इकरार हुआ’ या गाण्यातील एका ओळीवर वादविवाद झाले होते. शब्द लिहिले होते, “रातें दसों दिशाओं की दोहराएगी कहानियॉं.’ या ओळीवर सखोल चर्चा झाल्यानंतरच ती कायम ठेवण्यात आली. पूर्वी गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक असे सगळे एकत्र बसून गाणे ओके करीत असत. “मुघले आजम’मधील “प्यार किया तो डरना क्या’ गाण्यामध्ये के. असिफ यांनी शकील बदायूं आणि नौशाद साहेब यांच्याकडून 100 वेगवेगळे मुखडे लिहवून घेतले होते आणि नंतरच त्या गाण्याला मान्यता दिली होती. आजकाल असे होऊ शकते का? पूर्वीचा समर्पणभाव जपण्यास आजच्या इन्स्टंट जमान्यात कुणाकडे वेळ आहे का? त्यामुळेच गाणी येतात आणि जातात.