Friday holiday : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यात जातीय जणगणना करून संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली होती. त्यातच आता पुन्हा एकदा असाच मोठा निर्णय त्यांनी घेतला आहे. बिहारमधील उर्दू शाळा, मुस्लिमबहुल भागात शुक्रवारी सुट्टी जाहीर केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे बिहारचे राजकारण ऐन थंडीत चांगलेच तापले आहे. या निर्णयावरून भाजपने नितीशकुमार सरकारवर मोठा हल्लबोल केला आहे.
बिहार सरकारने जाहीर केलेल्या उर्दू शाळा, मुस्लिमबहुल भागातील सुट्ट्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. बिहार सरकारने आता शुक्रवार हा उर्दू शाळांमध्ये साप्ताहिक सुट्टी म्हणून घोषित केला आहे, म्हणजेच बिहारमधील ज्या भागात मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे, तिथे आता शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी असेल. बिहार हे बहुधा देशातील पहिले राज्य असेल जिथे मुस्लिमांसाठी शुक्रवारची सरकारी साप्ताहिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हा आदेश केवळ उर्दू शाळा किंवा मक्तबांसाठी नसून मुस्लीमबहुल भागात असलेल्या कोणत्याही सरकारी शाळेला आता रविवारऐवजी शुक्रवारी सुट्टी असेल, असे स्पष्ट निर्देश या निर्णयात देण्यात आले आहेत. याबाबत शिक्षण विभागाकडून अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे, मात्र त्यासाठी त्या जिल्ह्याच्या डीएमची परवानगी घ्यावी लागणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच डीएमने संमती दिल्यास रविवारऐवजी शुक्रवारी कोणत्याही शाळेत सुट्टी जाहीर केली जाऊ शकते.
एवढेच नाही तर शिक्षण विभागाने 2024 मधील सरकारी शाळांमधील सुट्ट्यांची यादीही समोर आणली असून, त्यात शिक्षण विभागाने 2024 मध्ये ईद आणि बकरीदच्या सुट्ट्यांमध्ये वाढ केली आहे. पूर्वी ईद आणि बकरीदला दोन दिवस सुट्टी असायची. 2024 मध्ये दोन्ही सणांना प्रत्येकी तीन दिवस शाळा बंद राहतील. याशिवाय मोहरमला दोन दिवस, शब-ए-बरात, चेहल्लूम आणि हजरत मोहम्मद साहिब यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येकी एक दिवस सुट्टी असेल. जन्माष्टमी, रामनवमी, महाशिवरात्री, राखी, तीज, जितिया अशा अनेक सणांच्या सुट्या सरकारने रद्द केल्या आहेत.
या निर्णयामुळे भाजपने आगपाखड केली आहे. नितीश सरकार बिहारमध्ये गझवा-ए-हिंद कायदा आणू इच्छित आहे, असे आम्ही पूर्वीपासूनच म्हणत आहोत आणि या निर्णयामुळे आमचे आरोप आणि शंका सत्यता उतरल्याचे भाजपचे आमदार हरिभूषण ठाकूर बच्चौल यांनी म्हटले आहे. तसेच आता नितीशजींनीही बिहारला इस्लामिक राज्य म्हणून घोषित करावे, अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.