केंदूर -पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील मार्केटयार्डमध्ये केंद्राच्या निर्यातबंदी निर्णयामुळे चार हजार कांद्याच्या पिशव्या पडून राहिल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याने शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर यांनी निर्यातबंदीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.
केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला आणि त्याची तातडीने अंमलबजावणी केल्यामुळे पिंपळे जगताप येथील उपबाजार केंद्रात जवळपास चार हजार कांद्याच्या पिशव्या पडून राहिल्या आहेत. हा कांदा जागेवरच सडून जाणार असल्याची चिंता सभापती जांभळकर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा अघोषित निर्णय तातडीने मागे घ्यावा, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या कांदा निर्यातबंदी निर्णयामुळे शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान त्यामुळे शेतकरी वर्गात केंद्र सरकारबाबत मोठी नाराजी पसरली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.