राजगुरूनगर – चासकमान धरणाच्या हुतात्मा राजगुरू जलाशयांमध्ये मत्स्य संवर्धन करण्यासाठी विविध प्रकारच्या जातीची 4 कोटी मत्स्य बीज सोडण्यात आली होती; मात्र तालुक्यात सलग 15 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे चासकमान धरणातून 52 हजार क्युसेक वेगाने खाली भीमा नदीत पाणी सोडण्यात आल्याने मत्स्यबीज वाहून गेले. यामध्ये ल्याने तीन कोटींचे नुकसान झाले आहे.
धुवोली (ता. खेड) येथील हरिदास जठार या ग्रामीण भागातील उद्योजकाने चासकमान जलाशयाचा मासे उत्पादनाचा मोठा ठेका पाच वर्षांसाठी घेतला आहे. त्यातील 2018 ते पहिले वर्ष त्याची ठेका रक्कम 56 लाख व अनामत रक्कम 46 लाख, तर 2019मध्ये 62 लाख रुपये राज्य शासनाकडे जमा केली होती. टेंडर घेतल्यानंतर जठार यांनी राहू, कटला, मृगल, पोपट, सायप्रस व कोळंबी अशा प्रकारचे तब्बल चार कोटी मत्स्यबीज या जलाशयात सोडले होते. बीज सोडतेवेळी धरणाचे प्रशासकीय अधिकारी, मत्स्य विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. अनुक्रमे दि. 26 व 29 नोव्हेंबर 2018 रोजी बीज संचयन करण्यात आले होते. त्यासाठी खाद्य म्हणून भाताचा कोंडा हा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये 15-15 दिवसांच्या अंतरावर एकूण साडेदहा टन टाकण्यात आला होता. कोळंबीसाठी मार्च, एप्रिल, मे, जून या महिन्यात एकूण 11 टन नाचणी टाकण्यात आली होती.
मासे वाढविण्यसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला. यासाठी हरिदास जठार यांनी कर्ज घेऊन हा मत्स्यसंवर्धन व मासेमारी व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे मासेमारी करणाऱ्या सुमारे 150 ते 200 नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला होता. त्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी जाळी, पिंजरे मासे पकडण्यासाठी टाकले होते. त्यालाही मोठा खर्च झाला; मात्र पाणी सोडल्याने आलेल्या महापुरात धरणातील मासे, कोळंबीसह मासे पकडण्याचे पिंजरे, जाळी वाहून गेले. त्यामुळे सबंधित ठेकेदार व स्थानिक नागरिक आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने व मत्स्य विकास महामंडळाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरीत आहे.
उपासमारीची आली वेळ
अतिवृष्टीमुळे धरणातील बोटींचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे हे संकट आले आहे, त्यामुळे या उद्योजकाचे मोठे नुकसान तर झालेच शिवाय स्थानिक मासेमारांची जाळी, पिंजरे वाहून गेल्याने आणि मासे वाहून गेल्याने सुमारे 150 ते 200 जणांचे नुकसान झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.