कापूरहोळ – पुणे-सातारा महामार्गावरील निगडे (ता. भोर) येथे विजेचा धक्का लागून चार शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुंजवणी-नीरा नदीपात्रातील निगडे येथील बंधाऱ्यात पाणी कमी झाल्याने पाण्यात नेहमीप्रमाणे मोटार ढकलत असताना अचानक वीज परत आली. यावेळी पाण्यात वीजप्रवाह उतरल्यामुळे चौघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये मुलगा आणि वडील यांचा समावेश आहे. ही घटना घडण्याच्या आधी सहा वेळा लाईट गेली होती. चौघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत.
घटास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील निगडे (ता. भोर) येथे गुंजवणी नदीच्या पाण्यात शेतीसाठी पाणी पुरवठा करण्यात येणारी मोटर टाकत असताना विजेचा धक्का लागून विठ्ठल सुदाम मालुसरे (वय 45), सनी विठ्ठल मालुसरे (वय 26), आनंदा ज्ञानेश्वर जाधव (वय 55), अमोल चंद्रकांत मालुसरे (वय 36, सर्व रा. निगड, ता. भोर) हे जागीच मृत झाले. ही घटना गुरुवारी (दि. 15) सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास घडली.
घटनास्थळी भोर-वेल्हा- मुळशीचे आमदार संग्राम थोपटे, भोर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पुणे जिल्हा शिवसेना संघटक कुलदीप कोंडे, भाजप तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, “राजगड’चे उपाध्यक्ष पोपटराव सुके, महसूल, महावितरण, राजगड पोलीस, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले होते.