सातारा – लंपी आजाराने मृत झालेल्या जिल्ह्यातील 913 जनावरांच्या मदतीपोटी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर दोन कोटी 39 लाख 99 हजार रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार आहे. लंपीने मृत जनावरांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात सातारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.
जिल्ह्यात लंपी स्किन संकटामुळे शेतकरी पुरता कोलमडला असून त्याला सावरण्यासाठी राज्य शासनाने मदतीचा हात पुढे केला आहे. लंपी आजाराने जळगाव जिल्ह्यात चार महिन्यांपूर्वी शिरकाव केला. हळूहळू राज्यभरात या आजाराचा फैलाव वाढत जाऊन जनावरे दगावण्याचे प्रमाणही वाढले होते. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना लंपीच्या संसर्गाने घेरले होते. खटाव व फलटण तालुक्यात बाधित आणि मृत जनावरांचे प्रमाण जास्त होते. हा आजार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने उपाययोजना राबविल्याने मागील काही दिवसात हा आजार आटोक्यात आला आहे. लसीकरणही 99 टक्के पूर्ण झाल्याने संसर्गाच्या फैलावाला आळा बसला आहे.
लंपी आजाराने शेतकऱ्यांना फटका बसल्याने त्यांना आर्थिक मदत मदत म्हणून दुधाळ जनावरे 30 हजार, बैल 25 हजार, तर एक वर्षाखालील पशुधनास 16 हजार मदत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यात 1199 बाधित जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामधील आजअखेर 913 मृत जनावरांचे अनुदान शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा झाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच आर्थिक सहाय्य जमा करणार असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले.
लंपी आजाराने मृत झालेल्या जनावरांसाठी शेतकऱ्यांना गतीने आर्थिक सहाय्य देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्या मार्गदर्शनानुसार आठवड्यात दोन वेळा आढावा घेवून प्रस्ताव मंजूर करण्यात येत आहेत. त्यानुसार गुरुवारअखेर 913 मृत जनावरांपोटी आर्थिक सहाय्य देण्यात आले आहेत. पशुधन सुरक्षित राहण्यासाठी “माझा गोठा, स्वच्छ गोठा’ अभियान राबविण्यात येणार असून या अभियानाची गावोगावी जनजागृती करण्यात आली आहे.
डॉ. संजय शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी