कराड, (प्रतिनिधी) – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आटके टप्पा ता. कराड येथे नवीन बांधलेल्या आरसीसी गटाराच्या खड्ड्यात सोमवारी सकाळी 11.30 च्या सुमारास भरधाव कार पडून, सुधीर श्रीरंग भिसे (वय 56), रंजीता सुधीर भिसे (वय 45), संजय मोहन देवकुळे (वय 50) व साक्षी शेलार (वय 53, सर्व रा. दह्यारी-हवेली, पुणे) हे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत माहिती अशी, भिसे कुटुंबीयांसह चार जण कार (एमएच-12-आरके-4021) मधून सोमवारी सकाळी पुण्याकडे निघाले होते. पुणे-बंगळुरू महामार्गावर आटके टप्पा परिसरात, चालकाचा कारवरील ताबा सुटला. तेथे नवीनच बांधलेल्या आरसीसी गटाराच्या खड्ड्यात कार पडून, चौघांच्या पायांना आणि डोक्यांना मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी, महामार्ग व कराड तालुका पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना कृष्णा रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद रात्री उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात झाली नव्हती.