पुणे, [प्रभात वृत्तसेवा} – आपल्या शरीरात पाच ज्ञानेंद्रिये आहेत. त्यामध्ये इंद्रिये, त्याचा विषय आणि प्रवृत्ती हे तीन भाग आहेत. कान, डोळे, नाक, जीभ, स्पर्श या इंद्रियांचे विषय आणि प्रवृत्ती वेगवेगळे आहेत. इंद्रियांमधून आपण ज्ञान ग्रहण करू शकतो आणि विषयाचा बोध देखील मिळवू शकतो. प्रत्यक्षात कान आणि डोळे ही दोन मोठी इंद्रिये ज्ञानप्राप्तीची प्रमुख माध्यमे आहेत, त्यांचा उपयोग ज्ञानप्राप्तीसाठी अधिकाधिक व्हायला हवा, असे जैन तेरापंथचे धर्मसंघाचे महातपस्वी आचार्य श्री महाश्रमणजी यांनी सांगितले.
आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीतर्फे गंगाधाम चौकाजवळील वर्धमान सांस्कृतिक केंद्रात आचार्य श्री महाश्रमणजी यांची प्रवचनमाला सुरु आहे. त्याच्या चौथ्या दिवशी ते बोलत होते. यावेळी खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ उद्योजक फत्तेचंद रांका, राजेंद्र बांठिया, माजी नगरसेवक प्रविण चोरबेले, ऍड. अभय छाजेड आदी उपस्थित होते.
राजकारणात अध्यात्मिकता गरजेची आहे. ते असेल, तर देशात चांगले राजकारण होऊ शकेल, असे खासदार डॉ. कुलकर्णी म्हणाल्या. तरुणाईमध्ये नशेचे प्रमाण अधिक वाढत आहे. पूर्वीच्या काळात या गोष्टीचे प्रमाण कमी होते. पुण्यात नशेचा प्रसार मोठया प्रमाणात होत आहे.
त्यामुळे आजच्या पिढीला यातून बाहेर काढण्यासाठी आपण कार्य करत असलेल्या एकता आणि धर्माच्या कार्याप्रमाणेच नशामुक्तीचे कार्य व्हावे. ड्रग मुक्त महाराष्ट्र हे अभियान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबवले जात आहे, त्यात आपणही सहभागी व्हावे, असे आवाहन मिसाळ यांनी केले.