कुर्डुवाडी (प्रतिनिधी): रेल्वे विभागीय उपअभियंत्याच्या बंगल्यातुन ११ लाख ८५ हजार रुपयांच्या ऐवजाच्या झालेल्या जबरी चोरी प्रकरणी पोलिसांनी अवघ्या २४ तासात चार जणांना अटक करुन सुमारे ४० ते ५० टक्के मुद्देमाल हस्तगत केला. या कामगिरीबद्दल कुर्डुवाडी पोलिस पथकाला १० हजार रुपयांचे बक्षीस अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
अटक केलेल्या चौघांना माढा न्यायालयाने १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी दिली असून उर्वरित चोरीचा माल हस्तगत करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वे रेस्ट हाऊस जवळील हरिप्रसाद दीक्षित यांच्या बंगल्याच्या नाईट वॉचमनला कोयत्याचा धाक दाखवून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ११ लाख ८४ हजार ४०० रूपयांचा ऐवज लुटून नेला होता. या प्रकरणी अटक केलेल्यांची गुन्ह्याची पार्श्वभूमी आहे का, आणखी कोणी सहभागी आहेत का याबाबत तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
लऊळ येथील मृत झालेल्या महिलेचा कोरोना लागण झाल्याचा सोर्स सापडला नसल्याचे सांगत चिंता व्यक्त केली. लॉकडाउनच्या काळात ग्रामीण भागात चोरी, महिला अत्याचार या गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले आहे परंतु मारामारी, शेतीतील वाद या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात सध्या एकही पोलिस कोरोनाबाधित नसल्याचे श्री झेंडे यांनी सांगितले.
कामगिरी केलेले पथक- पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र डोंगरे, तपासी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, पोलिस हेडकॉन्स्टेबल नितिन गोरे, पोलिस सागर गवळी, दत्ता सोमवाड, अशपाक शेख, विश्वजित ठोंगे, हेड कॉन्स्टेबल ललीत शिंदे, सायबर क्राईमचे अन्वर आतार, चालक सिद्धनाथ वल्टे