पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. समाजमाध्यमांत परस्पर येणाऱ्या तारखांवर पालक आणि विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. दहावी-बारावीच्या निकालाची तारीख अधिकृत जाहीर करण्यात येणार असल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले.
करोना विषाणू संसर्गामुळे दरवर्षीच्या तुलनेत दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल लांबला आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तरपत्रिकांचे संकलन आणि निकाल तयार करण्याची प्रक्रिया राज्य मंडळाकडून सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून दहावी आणि बारावीच्या निकालाच्या तारखा सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने परिपत्रकाद्वारे समाजमाध्यमांतील तारखांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत मंडळाकडून अधिकृतरित्या निकालाच्या तारखा जाहीर केले जाणार असल्याचे सांगितले.