नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या भारतीय खेळाडूंचा सोमवारी विशेष गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. आता यावरूनच माजी ऑलिम्पिकपदक विजेता भारताचा मुष्टियोद्धा विजेंदर सिंग याने सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
या सोहळ्याची पोस्टरबाजी का करण्यात आली व खेळाडूंचे फोटो छोट्या आकाराचे व पंतप्रधानांसह काही मान्यवरांचे फोटो मात्र, मोठ्या आकाराचे का लावण्यात आले, असा सवालही त्याने केला आहे.
खेळाडूंचे मायदेशात आगमन झाल्यावर त्यांचा सन्मान सोहळा येथील प्रसिद्ध पंचतारांकित अशोका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची पोस्टरबाजी हॉटेलच्या हॉलमध्ये करण्यात आली होती. त्यात सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रासह सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे फोटो छोट्या आकाराचे तर नेत्यांचे फोटो मोठ्या आकाराचे प्रकाशित करण्यात आले. यावरूनच या सरकारची चमकोगिरी दिसून येते अशी टीकाही त्याने केली.
यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, माजी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय राज्य क्रीडामंत्री निशित प्रामाणिक उपस्थित होते. या सोहळ्यासाठी मंचावर लावण्यात आलेल्या बॅनरवरुन अनेक स्तरावरून टीका सुरु झाली आहे. या बॅनरवर पदक विजेत्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो अधिक मोठ्या आकाराचा लावल्याबद्दलही विजेंदरने नाराजी व्यक्त केली आहे.