शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर लोकसभा व शिरूर तालुका, शिरूर शहर यामधील नागरिकांनी शासनाचे नियम पाळा, घरात रहा, सोशल डिस्टन्स ठेवून स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घेऊन कोरोना व्हायरस हरवण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू, तुम्ही घरातच रहा. बाहेर पडू नका असा मौलिक सल्ला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला.
मुंबई या ठिकाणाहून पुण्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत एक लाखाच्या आसपास नागरिक आले असल्याची माहिती असून, ही चिंतेची गोष्ट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून चार-पाच दिवसा अगोदर आलेल्या नागरिकांना सक्तीने शासनाचे ताब्यातील जागेत क्वारंटाईन करणे गरजेचे असून, हे नागरिकांच्या हिताचे आणि काळजीचे आहे, असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच शिरूर शहरासाठी व शिरूर तालुक्यासाठी कोरोना व्हायरस या संदर्भात अन्नछत्र असो किंवा इतर कुठली मदत लागली तर ती सर्व मदत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोना व्हायरस पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील शासकीय कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आज शिरूर येथे आले होते. यावेळी त्यांनी शिरूर नगरपरिषद येथे भेट देऊन नंतर तहसीलदार कार्यालय येथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सोशल डिस्टन्स ठेवून चार ते पाच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली.
यावेळेस तसीलदार लैला शेख, गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक तुषार पाटील, रवींद्र करंजखेले, जिल्हा उपप्रमुख पोपट शेलार, शिवसेना तालुका प्रमुख सुधीर फराटे, नगरसेवक संजय देशमुख, शहर प्रमुख मयूर थोरात उपस्थित होते. यावेळी त्यांनी मांडवगण फराटा आलेगाव पागा आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी मांडवगण आरोग्य केंद्र येथे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वतीने स्र्किनिंग करण्याची मशीन देण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले होम क्वारंटाईन हे नागरिकांच्या लक्षात न राहिल्याने ते बाजारात ठिकाणी फिरत असतात त्यामुळे शासनाने ताब्यात घेतलेल्या जागेत त्यांना क्वारंटाईन करणे गरजेचे आहे.
शिक्रापूर वाघोली लोणीकंद अपवाद वगळता शिरूर लोकसभा मतदार संघातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, हवेली या भागात पुणे- मुंबई प्रमाणे मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आपल्या भागात आढळले नाही. जुन्नर आंबेगाव या परिसरातून 400 ते 500 ट्रक रोज भाजीपाला मुंबई शहरात जात आहे, तसेच मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने लोक आपापल्या गावी परततात ही संख्या खूप मोठी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत एक लाखाच्या आसपास पुणे-मुंबईवरून नागरिक पुणे ग्रामीण भागामध्ये आले असून काही येत आहेत. या अगोदर काही आलेत त्यांच्यावर नजर ठेवली गेली होती. परंतु या चार-पाच दिवसात कोणी नागरिक आपापल्या भागात आले असेल त्याची माहिती प्रशासनाला देणे गरजेचे आहे. हे सगळे आपल्या हितासाठी आहे. अशा लोकांना प्रशासनानी उपलब्ध करून दिलेल्या जागेत क्वारंटाईन करणे गरजेचे आहे.
खेड, आंबेगाव या ठिकाणी अन्नछत्र सुरू केले असून शिरुर शहरालाही काही मदत लागल्यास ती सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन खासदार आढळराव पाटील यांनी देऊन शिरूर लोकसभा मतदारसंघातील डॉक्टर कर्मचारी पोलीस या सर्वांना 5000 मास्क, सॅनिटायझर बॉटल दिल्या. जुन्नर तालुक्यात 39 हजार तर आंबेगाव तालुक्यात 30 हजार नागरिक मुंबईवरून आले असून त्यांना येऊन बरेच दिवस झालेत परंतु येत्या चार-पाच दिवसात आलेल्या नागरिकांना शासनाने नेमलेल्या जागेतच क्वारंटाईन करणे गरजेचे आहे. यामुळे सोशल डिस्टन्ससिंग पाळले जाईल.
कोरोना व्हायरस आजाराच्या बाबतीत तहसीलदार, गटविकास अधिकारी ,पोलीस वैद्यकीय अधिकारी चांगल्या प्रमाणे आणि मनापासून काम करीत असून त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असे म्हणून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. शिरूर तालुक्यातील आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील पत्रकार हे आपले काम करताना सर्वात पुढे जाऊन तुम्ही बातमी घेत असतात त्यामुळे स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी असा सल्लाही त्यांनी यावेळी पत्रकारांना दिला.