वैकुंठवासिनी वो जगत्रयजननी वो। तुझा वेधु माझे मनी वो।। विस्मृती हा जिवाचा स्वभाव आहे. जीवन जगत असताना काही गोष्टी विसरता आल्या पाहिजेत किंबहुना विसरण्याची एक कला अंगी असावी. प्रत्येकच गोष्ट स्मरणात ठेवली तर अंतःकरणात कलुषता निर्माण होण्याचा संभव असतो. याकरिता ही निसर्गदत्त योजना आहे की सर्वकाही आपण स्मरणात ठेवू शकत नाही. मात्र आपल्या परमतत्वाला विसरण्याने फार मोठी हानी होते. “विसरली तया थोर झाली हानी। पचतील खाणी चौऱ्यांशीचा।।’ (संत तुकाराम महाराज)
आपल्या लौकिकातून वेळ काढून एकांतात आपल्या उपास्याची आठवण काढणे, त्याच्या स्मरणात वेळ घालवणे ही कीर्तनानंतरची नवविधा भक्तीपैकी असणारी “स्मरणशक्ती’ आहे. सतत माझं स्मरण असावं यासंबंधीचा विचार स्वतः भगवंताने अर्जुनास सांगितला आहे. तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर… (भगवद्गीता). चित्तवृत्तीला इतर सर्व बाबींचा विसर पडून नित्य परमेश्वराच्या ध्यानात मग्न असावे हा स्मरणभक्तीचा जागर म्हणजे विश्वरूप विश्वंभरे। कमळनयने कमळाकरे वो। तुझे ध्यान लागो बापरखुमादेविवरे वो।।
स्मरणामध्ये असणाऱ्या अनेक प्रकारांत, स्मरण, धारणा, ध्यान, ध्रुवानुस्मृती आणि समाधी यांद्वारा सगुणाबरोबरच निवृत्तीक अवस्थेपर्यंतचा विचार आहे. तथापि आपल्या उपास्य देवतेची काही सेवा आपणाकडून घडावी यासाठी पादसेवन ही पुढील भक्ती. भगवंताच्या दिव्य मंगलमय स्वरूपाची धातु अथवा मृत्तीकेची मूर्ती, प्रतिमा किंवा मानस मूर्तीच्या मनोहर चरणांचे श्रद्धापूर्वक दर्शन, चिंतन, पूजन आणि सेवन करत भगवत्प्रेमात तन्मय होऊन जाणे, याला पादसेवन म्हणतात.
आपल्या चंचल असणाऱ्या मनाला तुकाराम महाराज म्हणतात, मना तेथे धाव घेई। राहे विठोबाचे पायी।। प्रभू चरणाच्या सेवेची आर्तता मनाला लागण्यासाठीची नवरात्रीतील चौथी रात्र ही पादसेवन भक्तीच्या जागराची! तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा। माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा।।
(क्रमशः)
– हभप भागवत महाराज साळुंके