रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी पुन्हा एकदा अणुयुद्धाची धमकी दिली आहे. आपल्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाल्यास अण्वस्त्रांचा वापर केला जाईल, तसे आपल्याला करावे लागू नये याची अन्य देशांनी दक्षता घ्यावी असे त्यांना वाटते. त्यांचा खरा इशारा अमेरिकेकडे आहे. त्याचे कारण युक्रेन या मूठभर देशाने गेल्या दोन वर्षांत रशियाला चांगलेच थकवले आहे. युक्रेन केवळ अमेरिकेमुळेच एवढे सगळे करू शकला अशी त्यांना खात्री आहे. पुतीन यांना आपला विजय एवढा लांबेल अशी मुळीच अपेक्षा नव्हती. त्यांच्याकरता युक्रेनचा प्रतिकार हा पूर्णत: अनपेक्षित किंबहुना धक्कादायक होता. आता त्यांची अडचण अशी झाली आहे की 24 महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही ते ना विजयाचा आनंद उपभोगू शकत ना स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा दावा करण्याची सोय त्यांना राहिली आहे.
वैषम्य एकाच गोष्टीचे आहे की सुरक्षित जगाची कामना करणार्या आणि आम्ही त्याचे रक्षक असल्याच्या भूमिकेत वावरणार्या कोणालाही हे युद्ध संपवावेसे अद्याप का वाटत नाही? काही देशांनी युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला. पुतीन यांना सबुरीचा सल्ला दिला. तरी इतक्या महिन्यांनंतरही रशिया काहीतरी कारण शोधून काढून युक्रेनवर हल्ले करतो आहे. युद्ध बातम्यांमध्ये दिसते किंवा वर्तमानपत्रांत छापले जाते तेवढे सोपे नसते. त्याचे अत्यंत विदारक परिणाम होतात. पिढ्यान्पिढ्या त्यात उद्ध्वस्त होतात. युक्रेनमध्ये किमान 10 लाख माणसे आज आपल्याच देशात कैदेत आहेत. तर तेवढीच किंवा त्यापेक्षा अधिक माणसे विस्थापित झाली आहेत. कष्टाने उभारलेले आपले विश्व सोडून त्यांना देशातून परागंदा व्हावे लागले आहे.
देशातील सगळी यंत्रणाच एकतर उद्ध्वस्त तरी झाली आहे किंवा जी काय थोडीफार तगली आहे ती व्हेंटीलेटरवर आहे. केवळ युक्रेनलाच युद्धाचा फटका बसला नाही. तर त्या भागातली संपूर्ण वितरण साखळी विस्कळीत झाली आहे. जगातील अन्य भागही त्यापासून वंचित राहिलेला नाही. त्यातल्या त्यात दिलासा देणारी एकच गोष्ट म्हणजे रशियाने जेव्हा पहिले आक्रमण केले तेव्हा जगाची दोन भागांत वाटणी झाली होती. महायुद्धाचा भडका उडणार का, अशी भीतीही निर्माण झाली होती. सुदैवाने तसे झाले नाही. किमान या दोन वर्षांत या भीतीचा कोणी विचारही केला नाही. पण हा धोका टळला आहे असे आता जग मानते आहे का? किंवा त्यांनी तसे गृहीत धरू नये म्हणूनच तर पुतीन यांनी धमकावले नसेल? पुतीन यांना खरेच काय हवे आहे, असे अनेक प्रश्न आहेत.
युरोपियन देशांची ‘नाटो’ नावाची संघटना आहे. युक्रेनने त्याचे सदस्य होऊ नये अशी रशियाची इच्छा होती. तसेच युक्रेनला सदस्य करून घेऊ नये हा युरोपीय देशांना इशारा होता. त्याला कोणी भीक घातली नसल्यामुळे रशियाचा अर्थात त्या देशाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांचा तीळपापड झाला. ‘नाटो’च्या सदस्यत्वामुळे युक्रेनला पूर्णत: संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे युक्रेनचा घास गिळंकृत करणे जिकिरीचे होणार आहे, हे पुतीन यांच्या नाराजीचे कारण. युक्रेन अलिप्त राहत नाही तोपर्यंत नाराजी कायम राहणार आहे. सातत्याने हल्ले करून युक्रेनला जर्जर करणे, मिळेल त्या भागावर कब्जा करणे हेच पुतीन गेल्या दोन वर्षांपासून करत आहेत. त्यामागे त्यांचा अहंकारही आहे व त्या अहंकाराला कुरवाळण्यासाठी त्यांच्या मोहिमा सुरू आहेत.
युक्रेन जोपर्यंत शरणागती पत्करत नाही तोपर्यंत आपण थांबणार नाही असा पुतीन यांचा निश्चय आहे. त्यांच्या दुर्दैवाने असेल किंवा युक्रेनच्या संघर्षाचा परिणाम असेल की त्या देशाने अद्याप माघार घेतली नाही किंबहुना माघारीची आर्जवही केली नाही. अशा स्थितीत रशियासाठी हा प्रतिष्ठेचा मुद्दा झाला आहे. पुतीन यांच्या प्रत्येक वाक्यातून तेच जाणवते आहे. संघर्ष चिघळण्याचे काय परिणाम होतात याची अमेरिकेला आणि अध्यक्ष बायडेन यांना कल्पना आहे. मात्र जगाचा अणुयुद्धाच्या दिशेने प्रवास सुरू असल्याची कदाचित त्यांना अद्याप कल्पना आलेली दिसत नाही. आम्हाला धोका निर्माण झालाच तर आम्ही अण्वस्त्रांचा वापर करू शकतो असे पुतीन यांनी बजावले आहे. वास्तविक प्रदीर्घ संघर्षानंतर त्रागा न करता आणि आत्मक्लेष न करता पुतीन यांनी परिपक्वता दाखवणे अपेक्षित होते.
रशियाची विघटनानंतर जी काही थोडीफार पत होती तीही त्यांनी घालवली आहे असेच यातून सिद्ध होते आहे. जाहीर नाचक्की झालेले लोक अधिक धोकादायक असतात. त्याचे उदाहरण म्हणून पुतीन यांच्याकडे पाहावे लागणार आहे. देशातील यंत्रणा त्यांनी कधीच आपल्या कह्यात करून घेतली आहे. विरोधकांचा बीमोड केला आहे. पुढची सहा वर्षांची आपली राजवटही त्यांनी निर्धोक केली आहे. आता जगात पुन्हा उभी फूट पाडणारे त्यांचे इशारे अनुचित घटनेची किंवा घटनांच्या मालिकेची चाहुल देणारे आहेत.
केवळ एखादी परिषद भरवून किंवा सोपस्काराचा भाग म्हणून काही देश किंवा युरोपीय राष्ट्रे रशियाच्या विरोधात काही बोलत असतील. तथापि, हे सगळे करूनही अगोदर जे साधले नाही ते आता साधणार आहे का याचाही त्यांना आणि जागतिक संघटनांना विचार करावा लागणार आहे. लांबलेले युद्ध केवळ दोन देशांतील संघर्ष राहात नाही. वणवा पेटला की झळ सगळीकडेच पोहोचत असते.