भारतीय राजकारणातील एक शिस्तबद्ध पक्ष म्हणून ज्या पक्षाचे वर्णन करण्यात येते त्या भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र पातळीवरील राजकारणामध्ये माजी मंत्री आणि मराठवाड्यातील नेत्या पंकजा मुंडे यांनी सार्वजनिक व्यासपीठावर असंतोषाचे सूर आळवल्यामुळे निश्चितच भाजपाचे नेते अडचणीत आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे ज्या प्रकारे व्यक्त होत आहेत त्यावर भाजपाच्या कोणत्याही प्रमुख नेत्याने प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरी पंकजा मुंडे यांची ही नाराजी लक्षात घेऊन इतर राजकीय पक्षांनी त्यांना आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रण दिले आहे. ते पाहता भाजपाला या असंतोषाच्या सुराकडे लक्ष द्यावेच लागेल. राज्याच्या कानाकोपऱ्यात भाजपला पोहोचवण्याचे काम करणारे गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी गोपीनाथगड येथे बोलत असताना पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. “मी जरी भाजपची असले तरी भाजप माझा आहे की नाही, हे मला माहीत नाही’, असे विधान त्यांनी व्यासपीठावर केले होते. एवढेच नाही तर “येत्या काही दिवसांमध्ये माझे नेते असलेल्या अमित शहा यांची भेट घेऊन मी माझी पक्षातील भूमिका काय आहे याबाबत स्पष्टीकरण मागणार आहे’, असेही त्यांनी म्हटले आहे.
पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे आपली अशी भूमिका मांडली असताना दुसरीकडे त्यांच्या खासदार भगिनी प्रीतम मुंडे यांनीसुद्धा जाहीरपणे दिल्लीत जे महिला पैलवानांचे आंदोलन सुरू आहे त्याला पाठिंबा दर्शविला आहे. सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ही परिस्थिती पाहता नेहमीचे आपले दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबून हा विषय संपेल असे जर भाजपा नेत्यांना वाटत असेल तर तो गैरसमज ठरू शकतो. पंकजा मुंडे नाराज आहेत हे काही लपून राहिलेले नाही फक्त यावेळी त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पंकजा मुंडे पाच वर्षे मंत्रिपदावर कार्यरत होत्या; पण त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केल्यानंतर भाजपचे पंकजा मुंडे यांच्याकडे दुर्लक्ष झाले. या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांचे नंतर विविध कारणांनी पुनर्वसन करण्यात आले;
पण पंकजा मुंडेंना मात्र तसे महत्त्व देण्यात आले नाही. त्यानंतर झालेल्या कोणत्याही विधान परिषद निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना आमदारकी देऊन त्यांचे पुनर्वसन करणे शक्य होते; पण तसे झाले नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्येसुद्धा प्रीतम मुंडे यांना मंत्री म्हणून स्थान देण्यात आले नाही. उलट बीड जिल्ह्यामधीलच एक ओबीसी नेते भागवत कराड यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. या सर्व गोष्टी अतिशय उघडपणे घडत असल्यानेच पंकजा मुंडे यांची नाराजी असेल तर ती समजून घेण्यासारखी आहे. पंकजा मुंडे यांच्या विधानानंतर राज्यामधील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जी विधाने केली आहेत त्यावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे यांनी “मी माझी भूमिका जाहीरपणे घेईन कोणी मला काही सुचवण्याची गरज नाही’, असे म्हटले आहे. लवकरच अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सूचित केले आहे. या ठिकाणी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे “माझे नेते अमित शहा आहेत’ हे पंकजा मुंडे यांनी ठामपणे सांगितले आहे.
म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा असोत किंवा महाराष्ट्रातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असो किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत त्यांची मी भेट घेणार नाही, असेच अप्रत्यक्षरीत्या पंकजा मुंडे यांनी सुचवले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ओबीसींचा चेहरा म्हणून नेहमीच गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या कुटुंबाकडे पाहिले जाते. राजकारणामध्ये कित्येक वर्षांपासून कॉंग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांमध्ये मराठा नेत्यांचा प्रभाव असताना भाजपने गेल्या काही वर्षांपासून जाणीवपूर्वक ओबीसी नेत्यांना पुढे आणण्याचे धोरण राबवले होते. त्याचा चांगला परिणाम त्यांच्या निवडणुकीच्या यशावरही झाला होता. तरीही मुंडे भगिनींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून भाजप नक्की काय साध्य करत आहे या प्रश्नाचे उत्तर त्यांना लवकरच द्यावे लागेल, असे दिसते. पंकजा मुंडे यांना आपल्या भगिनी मानणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनासुद्धा गेल्या काही वर्षांपूर्वी भाजपने खूप महत्त्व दिले होते. पण सध्या तेसुद्धा भाजपवर नाराज आहेत.
एकनाथ खडसे यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. बाळासाहेब थोरात यांनीसुद्धा पंकजा मुंडे यांच्यासाठी कॉंग्रेसचे दरवाजे खुले असल्याचे विधान केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपने नेहमीच कॉंग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना या महत्त्वाच्या राजकीय पक्षांमधील प्रमुख नेत्यांना फोडून आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला. साहजिकच भाजपमधील एखादा महत्त्वाचा नेता जर आपल्या पक्षामध्ये येत असेल तर तो सर्वच राजकीय पक्षांना हवा आहे. पंकजा मुंडे यांच्या मनात निश्चित काय आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी त्यांच्या मनातील नाराजी मात्र उघड झाली आहे. अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर पक्षातील त्यांचे निश्चित स्थान काय आहे हे स्पष्ट होईलच; पण भाजपची आजपर्यंतची कार्यपद्धती पाहता अमित शहा यांच्याकडून हा विषय पुन्हा राज्यातील नेत्यांच्या हातात सोपवण्याची जास्त शक्यता आहे. पंकजा मुंडे या महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांवरच नाराज असल्याने त्यांना निश्चित कशाप्रकारे न्याय मिळेल हे सांगता येत नाही. खरेतर पंकजा ज्यांच्यावर नाराज आहे ते देवेंद्र फडणवीस हे एकेकाळी गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक मानले जायचे. काही कारणाने आता पंकजा यांचा फडणवीस यांच्यावर किंवा त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास राहिलेला नाही म्हणूनच आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागण्यासाठी त्यांनी थेट अमित शहा यांच्याकडे जाण्याची भूमिका घेतली आहे.
पंकजा नाराज असल्या तरी त्यांना आपली आगामी राजकीय भूमिका विचारपूर्वकच ठरवावी लागणार आहे. कारण बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करता धनंजय मुंडे यांचा प्रभाव वाढत चालला आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षही प्रबळ बनत चालला आहे. साहजिकच पंकजा यांची नाराजी दूर करण्यात भाजपाला यश आले तर त्या नव्या जोमाने पुन्हा भाजपमध्येच कार्यरत राहतील; पण जर ही नाराजी दूर झाली नाही तर मात्र त्यांना काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक आपली आगामी राजकीय भूमिका ठरवावी लागणार आहे.