गुजरातमध्ये काल मोरबी येथे मच्छू नदीवरील जुना तरंगता पूल कोसळून 140 पेक्षा अधिक लोकांना तेथे प्राण गमावावे लागले आहेत. अनेक जण जखमी झाले आहेत. छट पूजेच्या निमित्त त्या पुलावर मोठी गर्दी झाली होती. पुलावर एकदम पाचशे जण जमा झाल्याने हा तरंगता पूल अचानक तुटला अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. हा पूल ब्रिटिशकालीन आहे. तो सुमारे दीडशे वर्षे जुना आहे, असे काही लोक सांगतात. या दुर्दैवी घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही आज अनेक ठिकाणी प्रसारित झाले आहेत. घटना धक्कादायकच आहे.
हा पूल डागडुजीनंतर केवळ चार दिवसांपूर्वीच सामान्य लोकांसाठी खुला केला गेला होता. पूल जुना असला तरी तो नव्याने व्यवस्थित डागडुजी केलेला होता तरीही ही घटना कशी घडली, याचे आश्चर्य वाटल्याखेरीज राहात नाही. गेले सुमारे सात महिने तो दुरुस्तीसाठीच बंद ठेवला होता; परंतु घाईघाईने तो पुन्हा खुला केला गेला. या दुरुस्तीनंतर त्याचे जे फिटनेस सर्टिफिकेट घेणे गरजेचे होते तेही घेतले गेले नव्हते ही बाबही आता पुढे आली आहे. अजंता मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लि. या कंपनीला या पुलाची देखरेख आणि दुरुस्तीचे काम देण्यात आले होते. त्यासाठी कंपनीशी सन 2020 मध्ये करार करण्यात आला होता व सदर कंपनीला सन 2037 सालापर्यंत तेथे तिकीट विक्री करून आपला खर्च वसूल करण्याचा अधिकार दिला गेला होता. डागडुजीचे काम किमान आठ ते बारा महिने चालणे अपेक्षित होते; परंतु तो सुरू करण्याची घाई केली गेली आणि सात महिन्यांतच तो खुला केला गेला आहे.
आता ही घाई गुजरातमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली गेली किंवा कसे यावर अजून कोणी भाष्य केलेले नाही. पण घाई झाली आणि दुरुस्तीनंतर पुलाच्या तंदुरुस्तीचे जे सर्टिफिकेट संबंधित कंपनीने घेणे अपेक्षित होते ते घेतले गेले नाही त्यामुळे या दुर्घटनेचे सारे खापर सध्या कंपनीच्या माथी फोडले जात आहे. या प्रकरणात नऊ जणांना ताब्यातही घेण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचा आदेशही दिला गेला आहे. गुजरातमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत. त्याची धामधूम तिथे सुरू आहे. त्यामुळे या दुर्दैवी विषयाचे राजकारण होऊ नये अशी अपेक्षा असली तरी ते होणारच आहे आणि त्याची तेथे सुरुवातही झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरातमध्येच आहेत. ते घटनास्थळी धावून गेल्याचे ऐकिवात आलेले नाही.
ते तेथे मंगळवारी जाणार आहेत असे नंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी त्यांचा एकता नगरमध्ये सरदार वल्लभभाई पटेल स्मारकाजवळ एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते व त्यांच्या गुजरात दौऱ्यातील उर्वरित कार्यक्रमही वेळेनुसारच पार पाडले जातील, असे स्पष्ट करण्यात आले. एकतानगरमधील कार्यक्रमात मोदींनी ही दुर्घटना घडली असली तरी आणि त्याचे आपल्याला कमालीचे दु:ख झाले असले तरी आपल्याला कर्तव्य पथावर चालतच राहिले पाहिजे, असे नमूद करीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा पश्चिम बंगालमधील एका सभेतील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल केला जात आहे. त्यावेळी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पूल दुर्घटनेवरून त्यांनी राजकीय भाष्य करीत तेथील ममता बॅनर्जी सरकारवर हल्ला चढवला होता. आज मोरबीच्या पुलाच्या दुर्घटनेवरून राजकारण केले जाऊ नये अशी जर त्यांची अपेक्षा असेल तर त्यांनीच पश्चिम बंगालमधील अशाच एका दुर्घटनेवरून तृणमूल कॉंग्रेसच्या सरकारवर जोरदार राजकीय निशाणा साधला होता, ते कसे चालले, असा सवाल आता त्यांना केला जात आहे. मुळात जी घटना केवळ एक अपघात असते त्यावर राजकारण करू नये, असा साधा संकेत आहे. तो सगळ्यांनीच पाळला पाहिजे ही जरी अपेक्षा असली तरी मोदी आणि मंडळींना जर तो संकेत पाळता आलेला नसेल तर बाकीच्यांकडून आता तशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
मोदींच्या कार्यशैलीचा आणखी एक दुर्गुण अलीकडच्या काळात प्रकर्षाने समोर आला आहे, तो म्हणजे त्यांना इलेक्शनचे टायमिंग साधायची एक सवय आहे. त्यामुळेच अनेक ठिकाणच्या विकास प्रकल्पांच्या पूर्णत्वाच्या आधीच तेथे जाऊन ते उद्घाटनाचे कार्यक्रम करीत असतात. त्यातून होणाऱ्या घाईमुळे दुर्घटना घडतात हे या आधीही निदर्शनाला आले आहे. मध्यंतरी त्यांनी कोणत्या तरी महामार्गाचे उद्घाटन केले आणि आठवडाभरातच तो महामार्ग खचल्याचा प्रकार घडला आहे. त्याचाही दाखला आता दिला जात आहे. मोरबीचा पूल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशाच घाईने पूर्ण दुरुस्तीच्या आतच सुरू केला गेला त्यातूनच हा प्रकार घडला अशीही टीका आता सुरू होईल.
ते काहीही असले तरी इतकी मोठी दुर्घटना घडल्यानंतर एवीतेवी गुजरातेतच असलेल्या पंतप्रधानांनी तेथे धाव घेणे अपेक्षित होते ते झालेले नाही, ही बाबही खटकणारी आहे. निदानपक्षी आपल्या दौऱ्यातील कार्यक्रम त्यांनी मृतांप्रती सहानुभूती म्हणून स्थगित करणे अपेक्षित होते, असेही काही जण म्हणू शकतील. पण कर्तव्यपथ या नावाखाली मोदींनी आपले तेथील कार्यक्रम सुरूच ठेवले आहेत. याला बेफिकिरी किंवा अनास्था म्हणायचे की कर्तव्य कठोरता म्हणायचे हे ज्याचे त्यांनी आपल्या मतानुसार ठरवायचे आहे.
मोरबीच्या घटनेचा तपशील वाचल्यानंतर असे लक्षात आले आहे की, तेथील कंपनीला तिकीट विक्री करतानाच पुलावर गर्दी होणार असल्याची कल्पना यायला हवी होती. त्यामुळे त्यांनी पुलाची नाजुक अवस्था पाहून मर्यादित प्रमाणातच तेथे लोकांना सोडणे अपेक्षित असताना त्यांना केवळ वसुलीची घाई झाल्याने त्यांनी गर्दीची फिकीर केली नाही. पुलाच्या तंदुरुस्तीच्या धोक्याचीही त्यांनी जाण ठेवली नाही. अन्यथा तिकीट विक्री थांबवून ही गर्दी मर्यादित केली असती तर हा प्रकार घडला नसता आणि असंख्य लोकांना जीव गमवावा लागला नसता, हे मात्र खरे आहे.