सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असले, तरी या वार्यामध्येसुद्धा आगामी कालावधीमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीचे लक्ष्य ठेवूनच काम केले जात आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर आगामी कालावधीमध्ये ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत त्या राज्यांमधील प्रादेशिक पक्षही या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीचीच तयारी करत आहेत. या लोकसभा निवडणुकीला आम्ही फक्त दहा जागाच लढवत आहोत कारण आमचे लक्ष्य विधानसभा निवडणूक आहे, अशी स्पष्ट माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांनी दिली आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या महायुतीतील अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांनीसुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी जी तडजोड केली आहे त्याची भरपाई त्यांना विधानसभा निवडणुकीत मिळण्याची आशा आहे. आता महायुतीचा मित्र झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनीसुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा करताना कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले. साहजिकच या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आगामी विधानसभा निवडणुकीची समीकरणे जुळवण्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. रायगडसारख्या लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना सर्व प्रकारची मदत करण्याची हमी देताना एकनाथ शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला सुनील तटकरे यांच्याकडून सर्व प्रकारच्या मदतीची अपेक्षा आहे, असे स्पष्टपणे सांगितले आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी अनेक राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी अनेक विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली असल्यामुळे हे आमदार जर खासदार झाले तर त्यांच्या रिक्त ठिकाणी विधानसभा निवडणुकीत कोणाला संधी द्यायची याची जुळवाजुळवही आतापासूनच सुरू झाली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये लोकसभेचे 48 मतदार संघ आणि विधानसभेचे 288 मतदार संघ असल्याने सर्वसाधारणपणे एका लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ अंतर्भूत असतात आणि या प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाला किती मते मिळाली याची स्पष्ट माहिती मतमोजणीनंतर मिळते.
यानिमित्ताने त्या मतदारसंघातील आमदाराची विद्यमान ताकदही मोजली जाऊ शकते. या मतमोजणीनंतर विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या कलाबाबत काही त्रुटी समोर आल्या असतील, तर विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यात दुरुस्ती करण्याची संधीही आमदारांना उपलब्ध होते. लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या आघाडीच्या किंवा आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहत असताना आपल्या मतदार संघातील किती मतदार आपल्या पाठीशी सध्या आहेत हे जाणून घेण्याचेही काम या निमित्ताने आमदारांना करता येणार आहे. एखाद्या आमदाराने त्याच्या मतदारसंघामध्ये लोकसभा उमेदवाराला मोठ्या प्रमाणात आघाडी दिली, तर या आमदाराची विधानसभा निवडणुकीसाठीची परिस्थिती चांगली आहे असा अंदाज सहजपणे काढता येऊ शकतो.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांची निवड करताना हा एक निकष वापरला जाऊ शकतो याची जाणीव असल्यानेच सर्व विद्यमान आमदार सध्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवण्यासाठी झटत आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांतच विधानसभेची निवडणूक होणार असल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभेची गणिते मांडली जातील. पण यानिमित्ताने विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवत असतानाच लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघ आणि उमेदवार निश्चिती करत असताना जो गोंधळ झाला आहे त्या प्रकारचा गोंधळही गृहीत धरावा लागणार. लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असला, तरी महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीने आपल्या संपूर्ण उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली नाही. त्यापैकी काही जागांचा घोळ कायम आहे.
या जागांचा घोळ मिटवण्यासाठी विधानसभा निवडणुकीचे समीकरणच लक्षात घेतले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये योग्य सन्मान करण्याच्या अटीवर लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाला पूर्णविराम दिला जाईल, असे दिसते. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने त्यांच्या काही मित्र पक्षांना स्थान दिलेले नाही; पण विधानसभा निवडणुकीमध्ये या मित्र पक्षांचा चांगला सन्मान केला जाईल अशी अपेक्षा आहे. विशेषतः महाराष्ट्रात राजकारणासाठी महत्त्वाच्या ठरणार्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला लोकसभा निवडणुकीमध्ये एकही जागा देण्यात आली नसली, तरी त्याची भरपाई त्यांना विधानसभा निवडणुकीत करून द्यावी लागणार आहे. आणखी काही छोट्या मोठ्या पक्षांची गरजही विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पूर्ण करावी लागणार आहे.
आपल्या पक्षांसाठी लोकसभा निवडणुकीपेक्षाही विधानसभा निवडणूक महत्त्वाची असल्याची बाब शरद पवार किंवा राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांनी अजिबात लपवलेली नाही. कारण पक्षांची खरी ताकद विधानसभा निवडणुकीमध्येच आजमावली जाणार आहे. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीचे प्रश्नही अनेक वेळा वेगळे असल्याने या राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या प्रचाराची दिशाही बदलावी लागणार आहे. अर्थात, लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतरच खर्या अर्थाने या सर्व राजकीय पक्षांना आपली विद्यमान राजकीय ताकद काय आहे हे लक्षात येणार आहे आणि आगामी सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यामध्ये दुरुस्ती करण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये जागावाटप आणि उमेदवारी निवड यामध्ये आपला वरचष्मा राहावा यासाठी लोकसभा निवडणुकीतील यश हाच निकष वापरला जाण्याची शक्यता खूपच असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या आमदारांनी आणि दुसर्या क्रमांकावरील मते मिळवलेल्या पराभूत उमेदवारांनीसुद्धा या निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवून देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळेच सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार केला जात असला तरी सर्वांचे लक्ष मात्र विधानसभा निवडणुकीकडेच आहे आणि सर्वांचे लक्ष्यही आगामी विधानसभा निवडणूक हेच आहे.