एकेकाळी भारतात एकेका क्षेत्रातच कार्यरत असणारे उद्योजक किंवा उद्योगपती होते. मात्र, विशिष्ट क्षेत्रात मंदी आल्यास अथवा अडचणी आल्यास, अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे डायव्हर्सिफिकेशन किंवा विविध क्षेत्रांत प्रवेश करून, वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प सुरू करण्याची पद्धत सुरू झाली. सहारा इंडियाचे संस्थापक सुब्रतो रॉय यांनीदेखील अनेक क्षेत्रांत पंख पसरले. अक्षरशः शून्यातून त्यांनी विश्व साकारले. मात्र, झटपट यशस्वी होण्याच्या आकांक्षेतून केलेल्या करामतींमुळे ते नेहमीच वादग्रस्त राहिले. त्यांच्या निधनामुळे वेगाने प्रगती आणि अति वेगाने अधोगती अनुभवणारा उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेला आहे. बिहारच्या अरिया जिल्ह्यात रॉय यांचा जन्म झाला.
गोरखपूरच्या शासकीय तांत्रिक संस्थेतून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि तेथूनच व्यवसायाला सुरुवात केली. बिहारसारख्या मागासलेल्या राज्यात लहानपण गेले असूनही रॉय यांच्यामध्ये व्यापारी मनोवृत्ती जन्मजातच होती. त्यामुळे गोरखपूर येथेच हजार-दीड हजार रुपये भांडवलावर व्यापारास सुरुवात करून, रॉय यांनी अवघ्या 36 वर्षांमध्ये दीड लाख कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केला. त्यांनी सहारा समूहाची स्थापना केली आणि वित्त, रियल इस्टेट, प्रसारमाध्यमे, आरोग्य, मनोरंजन, पर्यटन अशा विविध क्षेत्रांत गुंतवणूक केली. त्यांचे साम्राज्य देशविदेशांत पसरले. रॉय यांनी प्रथम बॅंकिंगपासून व्यवसाय उभारणी केली आणि असंख्य गुंतवणूकदारांना आपल्याकडे खेचून घेतले. या गुंतवणुकीसाठी आकर्षक व्याज देऊ केले.
चिटफंडच्या माध्यमातून अनेक योजना आणल्या आणि हा निधी जमिनी व गृहबांधणी क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी वापरला. लखनौखेरीज कानपूर, गोरखपूर, हैदराबाद, भोपाळ, कोची, गुरुग्राम आणि पुण्यात सहाराने गृहबांधणी प्रकल्प सुरू केले. त्यासाठी त्यांनी एका अमेरिकन कंपनीला सोबत घेतले. केवळ मुंबई व इतरत्रच नव्हे, तर परदेशांतही हॉटेल्स सुरू केली. झारखंड आणि छत्तीसगडमध्ये ऊर्जा प्रकल्पात गुंतवणूक केली. देशातील उदारीकरणाच्या वाऱ्याचा फायदा घेऊन नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात प्रवेश केला. शिक्षणक्षेत्रात पाऊल ठेवत त्यांनी सहारा कॉलेज ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल सायन्स सुरू केले. मात्र रॉय यांनी सर्व माया गोळा केली, ती चिटफंडच्या बळावर आणि त्यामध्ये अनेक गैरव्यवहार झाले होते.
त्यामुळे हजारो गुंतवणूकदारांना मनस्ताप झाला, हे नाकारता येणार नाही. 1991 मध्ये रॉय यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते लखनौमध्ये “राष्ट्रीय सहारा’ या आपल्या वृत्तपत्राचा शुभारंभ केला. यथावकाश भारताच्या कॉर्पोरेट जगतात आणि फिल्मी जगतात महागड्या सुटाबुटात रॉय वावरू लागले. त्यांच्या वृत्तपत्रात पत्रकारांना मोफत प्रवास, उत्तमोत्तम आणि स्वस्तात भोजन, भरपूर पगार, बोनस आदी सुविधा देण्यात येत होत्या.
मात्र, सहाराश्री रॉय यांचे वर्तन सरंजामी होते. त्यामुळे ते आपल्या कंपनीच्या कोणत्याही कार्यालयात आले, की सर्वांनी उभे राहून बड्या साहेबांचे आणि त्यांचे बंधू जॉय रॉय यांचे छातीवर हात ठेवून स्वागत करण्याची ही प्रथा होती. ते कार्यालयात येत असले की लाल गालिचा अंथरला जाई आणि दोन्ही बाजूंनी पुष्पवृष्टी केली जात असे. आपले वृत्तपत्र खपवणाऱ्या विक्रेत्यांना सायकल व मोटरसायकल देण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. रॉय यांनी लखनौमध्ये गोमतीनगर ही एक ग्लॅमरस टाउनशिप उभारली. वर्तमानपत्रे आणि चॅनेल सोडून त्यांनी एका वलयांकित अशा जगतात प्रवेश केला. रॉय यांनी आपल्या मुलांच्या लग्नात पाचशे कोटी रुपये इतका खर्च केला, असे बोलले जात होते.
या शाही विवाहास दिल्ली, उत्तर प्रदेश वगैरे राज्यांतील बडे बडे मंत्री, नट-नट्या आणि क्रिकेटपटू यांनी हजेरी लावली होती. मुलायमसिंग, अमरसिंग यांच्याशी सहाराश्रींचे घनिष्ट संबंध होते. न्यूयॉर्क आणि लंडनमध्ये टीव्ही चॅनेल व हॉटेल्स असणारे ते एकमेव उद्योगपती होते. भारताने जेव्हा वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा टीममधील प्रत्येक खेळाडूस त्यांनी हवेली बहाल केली. भारतीय रेल्वेनंतर सर्वाधिक कर्मचारी असणारा उद्योग समूह म्हणजे सहारा, अशी या समूहाची कीर्ती पसरली होती. रॉय यांचे हे सर्व साम्राज्य म्हणजे फुगवलेला फुगाच होता. 2011नंतर सेबीने चिटफंड योजनेतील गडबडी बाहेर काढण्यास सुरुवात केली, तेव्हा सहारा समूह अडचणीत आला.
जवळपास 25 हजार कोटी रुपयांचे सहाराचे निधी गोठवण्यात आले. समूहाविरुद्ध अनेक खटले दाखल करण्यात आले. त्यानंतर रॉय यांना दोन वर्षे तुरुंगवास घडला. महाराष्ट्रात लोणावळ्याजवळील ऍम्बी व्हॅली प्रकल्पास तत्कालीन सरकारचा आशीर्वाद लाभला होता. लोकांना आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून भांडवल जमवायचे आणि त्या आधारे रियल इस्टेटसारख्या क्षेत्रात अपारदर्शी व्यवहार करायचे, त्यामधून मिळणाऱ्या नफ्याच्या आधारे राजकारणी आणि सेलिब्रिटीच्या मदतीने वेगवेगळ्या क्षेत्रात हातपाय पसरायचे… अडचणी आल्या, की नेत्यांची मदत घ्यायची, हे उद्योग करणारी एक जमात आपल्याकडे आहे. सुब्रतो रॉय हे त्यापैकीच एक. जेट एअरवेजचे नरेश गोयल, येस बॅंकेचे राणा कपूर, युनायटेड ग्रुपचे विजय मल्ल्या अशा अनेक उद्योगपतींनी गेल्या दोन-तीन दशकांत अर्थव्यवस्थेला हादरे दिले. मागच्या पाच-सहा वर्षांत तब्बल 27 उद्योगपतींनी हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशातून पळ काढला आहे.
अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ल यांनी लोकसभेतच लेखी उत्तरात दिली होती. गुंतवणूकदारांना ठकवणाऱ्या आणि सरकारचे कर बुडवणाऱ्या व्यापारी व उद्योगपतींना व्यवस्थेचा धाक राहिलेला नाही. रॉय यांच्यासारख्या उद्योगपतींनी व्यवस्थेतील कमतरतांचा फायदा घेतला. अल्पावधीत प्रचंड आर्थिक साम्राज्य उभे केले; परंतु पाहता पाहता हे साम्राज्य कोसळून पडले. माणसाला महत्त्वाकांक्षा असावी परंतु अतिमहत्त्वाकांक्षेपोटी नाही नाही ते उद्योग केले, तर शेवटी जसा उदय होतो, तसाच चटकन अस्तही होतो. सहाराश्रींच्या अंतिम समयी त्यांना फारसा कोणाचा सहारा उरलेला नव्हता. त्यांच्या जीवनापासून नव-उद्योजकांना योग्य तो बोध घेता येईल.