मर्यादित षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील बहुचर्चित अंतिम सामना काल अहमदाबाद येथे पार पडला. या स्पर्धेतील सर्व सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला या ऐन मोक्याच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला हे निराशाजनक ठरले. विषय सामना जिंकण्याचा किंवा हरण्याचा नाही आणि भारतच जिंकणार अशी अपेक्षा बाळगण्याचाही नाही, पण या अंतिम सामन्याच्या निमित्ताने जो ज्वर पेटवला गेला आणि त्यालाही पुन्हा राजकीय वातावरण निर्मितीची किनार दिली गेली ती बाब मात्र काहीशी अशोभनीय ठरली. नवस, होम, ज्योतिष, न्यूमरोलॉजी वगैरेतूनही भारताच्या विजयाचे भाकित केले गेले. त्यातून भारतीय खेळाडूंवर सामन्याच्या आधीच मोठे दडपण आणले गेले, हेच मानसिक दडपण भारतीय संघाच्या पराभवाला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरले, असे म्हणण्यास वाव आहे.
मैदानावर जमलेल्या एक लाख चाळीस हजार लोकांच्या प्रोत्साहनाचा लाभ भारतीय संघाला उठवता आला असता; पण या हजारो लोकांच्या अपेक्षांचे ओझे घेऊन मैदानावर उतरलेल्या भारतीय क्रिकेट संघाला हे ओझे जड झाले. अन्यथा सर्व स्पर्धेमध्ये कमालीच्या फॉर्मात असलेल्या भारतीय संघाला हा सामना तसा जड नव्हता. सामन्याच्या पराभवानंतर ज्या कॉमेंट येत आहेत त्यात अनेकांनी कर्णधार रोहित शर्माच्या घिसाडघाईला जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला आहे. रोहित शर्मा ज्या षटकात बाद झाला, त्या षटकात तब्बल बारा धावा निघाल्या असतानाही पुन्हा एक षटकार मारण्याचा प्रयत्न त्याने करायला नको होता, असे अनेकांचे निरीक्षण आहे.
ऐन मोक्याच्या क्षणी तो बाद झाल्यानंतर संघातल्या बाकीच्या खेळाडूंवर आलेले दडपण नंतरच्या विकेट्समुळे वाढत गेले आणि भारतीय संघ केवळ 240 या मर्यादित धावसंख्येवरच रोखला गेला. हे मर्यादित आव्हान ऑस्ट्रेलियासाठी अजिबातच अवघड नव्हते. त्यांचे पाच-सहा बॅट्समन नुसते खेळपट्टीवर येऊन गेले असते तरी त्यांना ही धावसंख्या पार करणे सहज शक्य होते आणि झालेही तसेच. ऑस्ट्रेलियाचा हा सहावा विश्वचषक विजय आहे. हा संघ क्रिकेट जगतात भारीच आहे हे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
एखादा सामना जिंकण्याचा निर्धार त्यांनी केला तर त्यांना हरवणे अवघडच असते याचाही प्रत्यय यानिमित्ताने पुन्हा आला आहे. काल ऑस्ट्रेलियाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचेही प्रात्यक्षिक उपस्थितांना घडवले. क्षेत्ररक्षणात त्यांनी भारताच्या किमान चाळीस ते पन्नास धावा वाचवल्या, यावर सर्वच क्रीडा समीक्षकांचे एकमत आहे. थोडक्यात काय तर त्यांनी उत्तम कामगिरी केली आणि ते जिंकले. एवढाच कालच्या सामन्याचा मतितार्थ असणे अपेक्षित आहे. पण आपल्याकडे यावरून एक नवेच राजकीय रणकंदन सुरू झाले आहे.
या पराभवाच्या ठिकऱ्या खेळाडू, निवड समिती किंवा प्रशिक्षकांवर फुटण्याऐवजी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर फुटल्याचा एक अजबच प्रकार यानिमित्ताने पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे. कालपासून या अनुषंगाने सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडत आहे आणि अर्थातच हे अयोग्य असले तरी जर काल भारत विजयी झाला असता तर त्याचाही राजकीय इव्हेंट करून पक्षीय वातावरण तापवण्याचा उद्योग भाजपकडून झाला असता, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे एखादा क्रिकेट सामना आणि त्याचा निकाल हाही आज राजकीय हिशेब चुकते करण्याचे निमित्त बनला आहे हेही अजबच म्हणावे लागेल. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही या विषयावरून भाजपचे वाभाडे काढले आहे.
भाजपने राजकीय इव्हेंटबाजीसाठीच हा ज्वर पसरवला होता, पाच राज्यांत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, त्यातील दोन महत्त्वाच्या राज्यांचे मतदान अजून बाकी आहे, भारत जिंकला असता तर मोदींच्या ‘नया भारत’चा नारा बुलंद करून वातावरण निर्मितीचाही घाट घातला गेला होता, असेही सांगितले गेले आहे. त्यामुळे एकूणच हा प्रकार उबग आणणारा ठरला. क्रिकेट या विषयाचा देशाच्या मुख्य प्रवाहातील राजकारणाशी संबंध जोडण्याचा किंवा त्यातून राजकीय वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न या देशात यापूर्वी कधीही झाला नव्हता. हा सारा रागरंग पाहून तिकडे कॉंग्रेसही त्याच्या प्रत्युत्तरासाठी सरसावलेली दिसली. त्यांनीही “जितेगा इंडिया’चे नारे दिले. त्यांना इंडिया या शब्दातून “इंडिया’ आघाडीसाठी वातावरण निर्मिती करायची होती. विशेष म्हणजे पहिल्यांदाच दिल्लीतील कॉंग्रेसच्या मुख्यालयात क्रिकेट मॅचचे मोठ्या स्क्रीनवर प्रदर्शन घडवले गेले आणि कोणाला क्रिकेटचेच राजकारण करायचे असेल तर आम्हीही मागे राहणार नाही हे दाखवून दिले होते.
मोदींच्या अहमदाबाद येथील उपस्थितीचा संदर्भ देऊन त्यांना पनवती अशी उपमा देऊन त्यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्नही याच भावनेतून झाला आणि पनौती किंवा पनवती या शब्दाचा हॅशटॅग सोशल मीडियावर जोरात चालवला गेला. मार्केटिंगच्या या जमान्यात हा सारा प्रकार अपेक्षितच असला तरी त्याचा इतका कहर अपेक्षित नव्हता. बाकी विश्वचषक हातचा गेला असला तरी भारतीय क्रिकेट संघाच्या या स्पर्धेतील कामगिरीला सलामच केला पाहिजे. यापूर्वी कधी नव्हे इतका भारतीय संघ फॉर्मात आहे. नवनवीन टॅलेंट संघात आले आहेत. आयपीएलमुळे स्थानिक खेळाडूही नावारूपाला आले आहेत आणि त्यांनाही भरभक्कम पैसे मिळण्याची व्यवस्था आज देशात निर्माण झाली आहे.
क्रिकेट इतकेच महत्त्व अन्यही क्रीडा प्रकारांना मिळायला हवे आहे, हे जरी खरे असले तरी क्रिकेट हा एकमेव क्रीडा प्रकार तमाम भारतीयांना आवडतो याला कोण काय करणार? हा केवळ दहा-बारा देशांत खेळला जाणारा खेळ आहे, हा नॉन ऑलिम्पिक गेम होता, जगातले कोणतेही श्रीमंत किंवा पुढारलेले देश किक्रेटमध्ये वेळ वाया घालवत नाहीत, वगैरे कुत्सित टिप्पण्यांमुळे भारतीय क्रिकेट शौकिनांमध्ये जराही हिरमुसलेपण येत नाही. उलट भारतीय संघ आज क्रिकेट क्षेत्रात जगातला अव्वल संघ आहे याचा भारतीय क्रीडा रसिकांना रास्त अभिमान आहे. त्यामुळे काल अहमदाबादच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवामुळे क्रीडा रसिक निराश झाले असले तरी त्यांचा भारतीय संघावर अजिबात रोष नाही. आपल्या क्रिकेटपटूंनी रसिकांना उत्तम आनंद दिला हेही नाकारता येत नाही. मात्र, खेळाकडे खेळ म्हणूनच पाहण्याची दृष्टी आपण कायम ठेवायला हवी.