राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा मुंबईत समारोप झाला. त्यानिमित्त काल मुंबईत शिवाजी पार्कवर ‘इंडिया’ आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची एक जंगी सभा झाली. या सभेतील नेत्यांची व श्रोत्यांची उपस्थिती तसेच सभेचा एकूण माहौल पाहिला तर ही लोकसभा निवडणूक भाजपला एकतर्फी असणार नाही, याचे स्पष्ट संकेत देणारी ठरली आहे हे येथे नमूद करावे लागेल. देशाच्या राजकारणातील जे प्रमुख राजकीय पक्ष आहेत ते पक्ष काँग्रेसबरोबर असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसले आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या सुरुवातीच्या सभांना किंवा बैठकांना जे पक्ष उपस्थित होते, त्यातील नितीशकुमार, ममता बॅनर्जी असे काही नेते आघाडीतून बाहेर गेले आहेत.
नितीशकुमार हे सरळ भाजपबरोबर गेले आहेत; पण ममता मात्र ‘इंडिया’ आघाडीतून बाहेर गेल्या असल्या, तरी अजून त्या भाजपबरोबर गेलेल्या नाहीत आणि भविष्यातही त्या त्यांच्याबरोबर जाण्याची शक्यता नाही. त्या उलट भाजपप्रणित ‘एनडीए’ आघाडीत मात्र संख्येने अनेक पक्ष असले तरी मुख्य राजकीय प्रवाहातील पक्षांची संख्या अगदीच तोकडी आहे. अलीकडेच त्यांना मिळालेले नितीशकुमार आणि आंध्रातील चंद्राबाबू नायडू हे त्यातल्या त्यात नाव घेता येतील इतके मोठे पक्ष त्यांच्याबरोबर आहेत. इकडे ‘इंडिया’ आघाडीकडे मात्र मातब्बर पक्षांची रांग आहे. त्यात डावे आहेत, समाजवादी, राजद, द्रमुक, शिवसेना ठाकरे गट, शरद पवार गट, आम आदमी पक्ष अशा पक्षांची मोठी फळी त्यांनी उभी केली आहे. या फळीत शेवटपर्यंत किती फाटाफूट होणार हा मध्यंतरी त्यांच्यासाठी चिंतेचा विषय होता.
पण या आघाडीतील सर्वच प्रमुख पक्षांनी आपापसातील जागा वाटप निश्चित केले आहे. त्यामुळे आता त्यांच्यात फाटाफुटीला फार वाव राहिलेला नाही, असे कालच्या सभेतून दिसून आले आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपात अडथळा ठरलेले प्रकाश आंबेडकरही उत्स्फूर्तपणे कालच्या शिवाजी पार्कवरील सभेला उपस्थित होते. त्यामुळे त्यांचा महाविकास आघाडीतील प्रवेश जवळपास जमेला धरला जाऊ लागला आहे. त्यामुळे ही महाविकास आघाडी आता अधिक प्रभावी ठरू शकते, अशी गणिते मांडली जाऊ लागली आहेत. पण एकूणातच भाजपच्या प्रभावशाली निवडणूक कार्यपद्धतीला विरोधकांच्या भक्कम आघाडीचे आव्हान निर्माण करण्याच्या प्रयत्नाला कालच्या सभेने चांगला हातभार लागला आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
मोदींचा व भाजपचा जो सुसाट झंझावात देशात गेल्या काही दिवसांत निर्माण केला गेला होता, त्याला तोंड देण्यास विरोधक शिल्लक आहेत की नाहीत अशी जी स्थिती निर्माण झाली होती त्यातून आलेली मरगळ कालच्या सभेने अनेक अर्थाने दूर झाली आहे. मुख्य म्हणजे कालच्या सभेतील राहुल गांधी यांचे भाषणही प्रभावी झाले. त्या भाषणाचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी त्यांच्या भाषणातील एखादा शब्द किंवा एखाद्या वाक्याचा आधार घेऊन नरेंद्र मेादींकडून जो घणाघात सुरू होतो, तोही त्यांनी लगेच सुरू केला आहे. कालच्या सभेत राहुल गांधी यांनी मोदींच्या मागे असलेल्या शक्तींच्या विरोधात आपल्याला संघटितपणे लढायचे आहे आणि या शक्ती नेस्तानबूत करायच्या आहेत, असे उद्गार काढले होते. यातील शक्ती हा शब्द उचलून मोदींनी पुन्हा राहुल यांना घेरण्याचा आज प्रयत्न केला आणि या शक्ती शब्दाला त्यांनी वेगळेच रूप देण्याचा प्रयत्न केला. मोदी म्हणाले आहेत की, या देशातील नारी शक्ती ही खरी शक्ती आहे आणि आपण भारत मातेचे पूजक आहोत आणि भारत मातेची शक्ती ही खरी शक्ती आहे. आपण या शक्तीचे पूजक आहोत;
पण काही जण या शक्ती नष्ट करायला निघाले आहेत, असे त्यांनी नमूद केले आहे. मोदींच्या गेल्या काही वर्षातील निवडणूक भाषणांचा आढावा घेतला तर राहुल गांधी किंवा काँग्रेस नेत्यांकडून झालेली वक्तव्ये हे मोदींच्या भाषणातील मुख्य इंधन असते आणि ते अत्यंत प्रभावीपणे विरोधकांना सभांमधून नेस्तानबूत करीत असतात. त्याच मार्गावर मोदींनी पुन्हा वाटचाल सुरू केलेली दिसते आहे. पण यावेळी काँग्रेसही बर्यापैकी सावध झालेली दिसते आहे. मोदींच्या वक्तव्याला त्याच दिवशी जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न काँग्रेस प्रवक्ते पवन खेरांनी केला आहे. दैवी शक्ती आमच्या बाजूने आहे आणि आम्हाला दुष्ट शक्तींच्या विरोधात लढून त्यांना परास्त करायचे आहे, असे नमूद करीत मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. ज्या नारी शक्तीचा पंतप्रधानांनी उल्लेख केला त्या नारी शक्तीवर गेल्या अनेक वर्षांत झालेले अन्याय, अत्याचार आणि बलात्काराच्यावेळी हे शक्तीपूजक कोठे होते,
असा सवाल करीत त्यांनी मणिपुरात महिलांवर झालेले अत्याचार, ब्रिजभूषण शरणसिंह यांनी महिला कुस्तीपटूंवर केलेले लैंगिक अत्याचार अशा प्रकरणांचा उल्लेख करीत मोदींना प्रभावी प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे अशा चकमदार वक्तव्यांचा संघर्ष आपल्याला निवडणूक काळात पुढील सुमारे अडीच महिने पहायला मिळणार आहे. पण आता एक बाब मात्र पवन खेरांच्या उत्तरामुळे स्पष्ट झाली आहे की, कायम काँग्रेस नेत्यांना गिर्हाईक करीत त्यांना एकतर्फी झोडपण्याचे भाजप नेत्यांचे तंत्र यावेळी फार तग धरण्याची शक्यता नाही. देशातील ही लोकसभा निवडणूक अनेक अर्थाने महत्त्वाची आहे. विरोधकांसाठी तर ही अस्तित्वाचीच लढाई आहे.
निवडणूक आचार संहिता लागू होण्यापूर्वी ज्या जनमत चाचण्या घेण्यात आल्या त्यात भाजपचा एकतर्फी विजय होणार असल्याची जी भाकिते केली गेली आहेत, ती तितकी खरी ठरणारी नाहीत याचे संकेत कालच्या ‘इंडिया’ आघाडीच्या सभेतून मिळाले आहेत. पण तेवढ्याने भागणारे नाही. जे घटक कालच्या सभेत एकत्र दिसले ते तितक्याच प्रभावीपणे प्रत्यक्ष मैदानावर कार्यरत राहिले तरच काही धडगत आहे अन्यथा भाजपच्या अत्यंत आक्रमक प्रचार शैलीत त्यांचा निभाव लागण्याची शक्यता नाही. एकतर सत्ताधारी पक्षाकडे सर्वच प्रकारची संसाधने आहेत. त्यामुळे एकजुटीने निकाराची लढाई देण्याखेरीज विरोधकांना आपले अस्तित्व आणि आव्हान या दोन्ही बाबी टिकवता येणार नाहीत, हेही त्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे.